महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

100 कोटी वर्षांपूर्वीच्या गुहेत 2 हजार वर्षांपासून केली जातेय 'अंबादेवी'ची पूजा; जाणून घ्या पौराणिक कथा - AMBA DEVI GUFA TEMPLE DHARUL

पौराणिक काळात अमरावती शहराचं विशेष महत्व राहिलं आहे. येथे असलेली श्री अंबादेवीचं मंदिर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

AMBA DEVI GUFA TEMPLE DHARUL
श्री अंबादेवी (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2024, 8:22 PM IST

Updated : Oct 8, 2024, 8:49 PM IST

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याच्या सीमेपासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर बैतुल जिल्ह्यातील धरुड गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर श्री अंबादेवीची गुहा आहे. शंभर कोटी वर्षे जुन्या या गुहेत दोन हजार वर्षांपासून अंबादेवीची पूजा केली जाते. गेल्या 14-15 वर्षांपासून या ठिकाणी नवरात्रोत्सवासाठी भाविक येत आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं अश्मयुगात या भागात आदिमानवांचं वास्तव्य असल्याचं स्पष्ट केलंय. रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियानं नोंद घेतलेल्या श्री अंबादेवी गुहेसंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.

जंगलानं वेढलाय संपूर्ण परिसर :मध्य प्रदेशात येणारं धारुड हे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत असून हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलानं वेढलाय. सपाट मैदानातून सातपुडा डोंगरावर अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री अंबादेवी गुहेपर्यंत जाण्यासाठी पायी चढावं लागतं. हा परिसर लाल आणि काळ्या खडकानं, लाल मातीनं आणि हिरव्यागार जंगलानं नटलाय. श्री अंबादेवी गुहेजवळ पोहोचल्यावर डोंगराच्या एका टोकावरून मोर्शी शहराजवळ असणारं सिंभोरा धरणाचं पाणी दिसतं. या जंगल परिसरात वाघासह अनेक जंगली प्राण्यांचा वावर असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

अमरावती धरुड येथील श्री अंबादेवीची गुहा (Source - ETV Bharat Reporter)

डोंगरावर बाराही महिने पाणी :सातपुडा पर्वत रांगेतील या भागात 100 कोटी वर्षांपूर्वी गुहा निर्माण झाल्यात. पाण्याच्या प्रवाहामुळं श्री अंबादेवीची गुहा तयार झाली. सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळं खडकाची झीज होऊन डोंगरात मोठी कपार तयार झाली. डोंगराच्या या कपारीत गुहा बनली. फार पूर्वी या भागात आदिमानवांचं वास्तव्य होतं. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी गुहेतील कपारीमध्ये मानव सदृश्य मूर्ती आढळली, तेव्हापासून ही मूर्ती 'अंबादेवी' म्हणून पूजली जाऊ लागली. श्री अंबादेवीच्या गुहेतून पाण्याचा झरा देखील वाहतो. या भागात डोंगरावर पाण्याचा हा एकमेव स्रोत आहे. या ठिकाणी बाराही महिने पाणी वाहतं, अशी माहिती सातपुडा पर्वत रांगेतील या परिसरात गुहांमध्ये असणाऱ्या शैलचित्राचा अभ्यास करणारे डॉ. व्ही टी इंगोले यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.

आदिमानवांचं होतं वास्तव्य :"श्री अंबादेवी गुहेसमोर असणारा भला मोठा उंच दगड आणि त्याला असणारी विशिष्ट कपार ही हे शैलगृह असल्याचं स्पष्ट करतं. या ठिकाणी विविध शैलचित्रं देखील आढळलीत. श्री अंबादेवीची गुहा जमिनीपासून अडीच किलोमीटर अंतरावर असली तरी या अंबादेवीच्या गुहेपासून सुमारे 35 किलोमीटरच्या परिसरात 300 हून अधिक लेणी आहेत. या गुहांमध्ये विविधं चित्र आढळतात. शहामृगासह हरीण, रानगवा, वाघ, अस्वल, हत्ती, घोड्यांची चित्र गुहांमध्ये कोरलेली दिसतात. शिवलिंग, योनी, आणि कमळ हे सुद्धा या गुहांमध्ये कोरलेली आहेत. यावरून संपूर्ण परिसरात आदिमानवांचं वास्तव्य होतं हे सिद्ध झालंय. श्री अंबादेवी गुहेप्रमाणेच इतर गुहांचं विविध वैशिष्ट्य आहे. या संपूर्ण गुहा पाहण्याकरिता 7 दिवस लागू शकतात," असं प्रा.डॉ. व्ही टी इंगोले म्हणाले.

नवरात्रोत्सवाला अशी झाली सुरुवात : गुहेत असणाऱ्या श्री अंबा देवीची पूजा ही गेल्या 2 हजार वर्षांपासून केली जातेय. घनदाट जंगलात असणाऱ्या या गुहेत मधल्या काळात या परिसरातील रहिवासी देवीच्या दर्शनाला यायचे. 2007 मध्ये डॉ. व्ही. टी. इंगोले, शिरीषकुमार पाटील, प्रदीप हिरुरकर, डॉ. मनोहर खाडे आणि दिवंगत ज्ञानेश्वर दमाहे यांनी धारूड परिसरातील काही रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुडा पर्वतावर अश्मयुगातील आदिमानवानं दगडावर केलेली रंगीत चित्रकला, दगडावरील कोरीव चित्रकला, दगडांचं लिंग आणि त्यांची पूजा, दगडावर कोरलेली लिपी यांचा शोध लावला. याचवेळी श्री अंबा देवी गुहा देखील त्यांनी पहिल्यांदा पाहिली. या गुहेत डोंगराच्या खाली असणाऱ्या काही गावांमधील भाविक अधून मधून देवीच्या दर्शनाला येतात हे लक्षात आलं. 2010 मध्ये धारूड गावातील एका व्यक्तीनं गुहेतील अंबादेवीला चांदीचा मुखवटा लावला. यानंतर प्रत्येक नवरात्रीला या ठिकाणी भाविक येण्यास सुरुवात झाली. आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील भाविक नवरात्रोत्सवानिमित्त श्री अंबा देवीच्या दर्शनाला हजारोच्या संख्येत या ठिकाणी येतात.

पौर्णिमेच्या रात्री भाविकांची गर्दी : "सातपुडा पर्वत रांगेतील श्री अंबा देवी नवसाला पावणारी देवी आहे. देवीच्या दर्शनानं अनेकांच्या अडचणी दूर झाल्या, अशी या भागातील रहिवाशांची श्रद्धा आहे. दर पौर्णिमेच्या रात्री श्री अंबादेवीच्या गुहेसमोर होम हवन केला जातो. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना राहण्याची व्यवस्था देखील आहे. पौर्णिमेच्या रात्री महाप्रसादही असतो," अशी माहिती लगतच्या चिंचोली गवळी येथील माजी सरपंच आणि मंदिरातील सेवक नामदेव गतफणे यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.

हेही वाचा

  1. 'शितलादेवी'च्या दर्शनाला आल्यास साथरोग होतात बरे; भाविकांची गर्दी, जाणून घ्या आख्यायिका - Shri Shitladevi Mandir
  2. 50 रुपयांपासून सुरुवात, आता करोडोंची उलाढाल; 'बीसी' ते 'मल्टी स्टेट सोसायटी'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
  3. बँक मॅनेजरची नोकरी सोडून हाती घेतलं 'एसटी'चं स्टेअररिंग; प्रवासी काढतात सेल्फी, फोटो
Last Updated : Oct 8, 2024, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details