छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : “मराठी भाषेचा जन्म मराठवाड्यात झाला. पण भाषेचे विद्यापीठ विदर्भात गेलं. याला मराठवाड्यातील मंत्र्यांची अनास्था आणि खुर्चीला चिटकून बसण्याचा स्वभाव जबाबदार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचवेळी अभिजात दर्जा मिळाला होता. आता केलेल्या घोषणेमुळं आणि मिळणाऱ्या निधीमुळं लेखक आणि नेते भारावून गेलेत. पण सरकारनं भाषा विकासासाठी ठोस तरतूद केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन : ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या शनिवारी उद्घाटन पार पडले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनुपस्थित असलेल्या भाषा मंत्री उदय सामंत आणि मंत्री अतुल सावे यांच्यावर कौतिकराव ठाले पाटील यांनी टीकेची तोफ डागली. “कोकणात मत्स्यविद्यापीठ असायला हवे, पण ते नागपुरात गेले. तसाच प्रकार मराठी विद्यापीठाच्या बाबतीत झाला. विदर्भातील नेत्यांकडं सत्ता आहे. त्यामुळं त्यांनी विद्यापीठ खेचून नेलं. पण मराठवाड्यातील मंत्री मात्र गप्प बसले,” असा टोला त्यांनी संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत लगावला. तर तमिळनाडू सरकारनं त्यांच्या भाषेच्या संवर्धनासाठी ठोस धोरण आखलंय. पण आपलं सरकार काय करणार?, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भाषा विषयक धोरणावरही नाराजी व्यक्त केली.