महाराष्ट्र

maharashtra

माळीणचं पुनर्वसन, मात्र दहा वर्षांनंतरही जखम भळभळतेय - Malin Landslide disaster

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 9:39 PM IST

Updated : Jul 30, 2024, 10:17 PM IST

Pune Malin Landslide : 30 जुलै 2014 रोजी माळीण गावात दरड कोसळून 151 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेला आज दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र माळीणची दुर्घटना आजही अनेकांच्या काळजाचा थरकाप उडवतेय.

Malin Landslide disaster
माळीण दुर्घटना (ETV BHARAT MH Desk)

पुणे Pune Malin Landslide :दहा वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील एका घटनेनं महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला होता. रात्रीच्या गाढ झोपेत काळानं घाला घालत 151 गावकऱ्यांचा जीव घेतला होता. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील माळीण दुर्घटनेनं अनेकांच्या जीवनात कायमची जखम भळभळतेय. आज या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्या घटनेची भीती या भागातील गावकऱ्यांच्या मनात अजूनही कायम आहे. 151 बांधवांचा जीव घेणारा हा अपघात आजही गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे.

151 जणांचा मृत्यू :दुर्घटनेनंनंतर माळीण गावाचं पुनर्वसन झालं, पण गाव पूर्णपणं उद्ध्वस्त झालं. लोकांच्या आठवणी आजही तशाच आहेत. मंचर ते आहुपे गाव या रस्त्यावर डिंभे धरणाच्या आत सत्तावीस किलोमीटर अंतरावर असलेलं माळीण हे छोटेसे गाव, यापूर्वी कधी लक्षात आलं नव्हतं. मात्र, या गावात दरड कोसळल्यानं तब्बल 151 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अनेक जण ढीगाऱ्याखाली दबले होते. मात्र, ही घटना पहिल्यांदाच समोर आली ती एका एसटी चालकामुळं.

9 जणांना जीवनदान :30 जुलै 2014 ची रात्र माळीण गावासाठी शेवटची रात्र होती. या भागात रात्रभर झालेल्या पावसामुळं डोंगरावरील दरड कोसळून संपूर्ण माळीण गाव डोंगराखाली गाडलं गेलं होतं. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 151 नागरिकांच्या नावानं गावात स्मारक उभारण्यात आलंय. तसंच 151 नागरिकांच्या नावानं झाडंही लावण्यात आली आहेत. प्रशासनानं रात्रंदिवस ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचं काम केलं. सहा दिवसांत सुमारे 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 9 जणांना जीवनदान मिळालं होतं.

जंगलतोडीमुळं झाला अपघात : पुण्याच्या भारतीय भूवैज्ञानिक पथकानं माळीण परिसराची पाहणी केल्यानंतर माळीण दुर्घटनेमागं नैसर्गिक कारणं असल्याचा अहवाल नोंदवला होता. या भागात जमीन सपाटीकरण, झालेली जंगलतोड प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात आलं. या घटनेनंतर राज्य, केंद्र सरकारनं ही घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली. सरकारनं माळीण गावाचं पुनर्वसन केलं. तसंच मृत व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही दिलं.

हे वाचलंत का :

  1. माळीण फाटा येथे 15 कोटी खर्चूनही खचला रस्ता! बारा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
  2. माळीण, तळीयेची पुनरावृत्ती नको, उपाययोजना करा; माळीणकरांची मागणी
  3. माळीणला केलेल्या मदतीची परतफेड; कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या सेवेला धावली मंचर ग्रामपंचायत
Last Updated : Jul 30, 2024, 10:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details