महाराष्ट्र

maharashtra

जितेंद्र आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार ? अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल; नेमकं प्रकरण काय? - Jitendra Awhad

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा तसंच विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार असून अटक टाळण्यासाठी आव्हाडांनी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलाय.

Jitendra Awhad filed bail application in Thane court to avoid arrest in Rida Rashid case
जितेंद्र आव्हाड (ETV Bharat)

ठाणे Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 22 जणांवर खोट्या गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी आव्हाडांची धावाधाव सुरु असून त्यांनी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलाय. शुक्रवारी (20 सप्टेंबर) ठाणे न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील सुनावणीसाठी 3 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आलीय. तर भाजपा अल्पसंख्यांक सेलच्या पीडित महिला नेत्यानं जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या हस्तकांवर अटकेची कारवाई होणार असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केलाय.


काय म्हणाल्या पीडित महिला नेत्या : जून महिन्यात जितेंद्र आव्हाडांसह 22 जणांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता याप्रकरणी अटक टाळण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. शुक्रवारी या अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पीडित महिला नेत्या म्हणाल्या की, "आव्हाडांची पोलखोल झाली असून सर्व आरोपींना न्यायालयात धाव घ्यावी लागलीय. या सर्व आरोपींना नक्कीच शिक्षा व्हायला हवी. या सर्वांनी कट रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आव्हाड यांच्यासोबत जे सुपारीबाज आहेत, ज्यांनी माझी सुपारी घेतली. त्यांनाही न्यायालयाकडून शिक्षा मिळेल", असा विश्वास व्यक्त करत सातत्यानं यासाठी लढत राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

काय आहे नेमकं प्रकरण? : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर 2022 मध्ये मुंब्रा वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित महिलेला दोन्ही हातांनी पकडून बाजूला हटवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला. या घटनेनंतर आव्हाड यांनी जुन्या घटनेवरुन एकाला हाताशी धरुन ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचा पीडितेचा आरोप आहे. मात्र, कोणताही पुरावा उपलब्ध न झाल्यानं हा ॲट्रॉसिटीचा कट अयशस्वी ठरला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून कलम 370, 370 (अ), 504, 34, सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमन कलम 3, 4, 5, चे कलम 4, 6, 10, 12, 17 प्रमाणे पीटा, पोक्सोचा गुन्हा पीडेतेविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. परंतु, तपासानंतर हाही गुन्हा निष्पन्न न झाल्यानं सखोल पडताळणीअंती ठाणे सत्र न्यायालयानं या खोट्या गुन्ह्यातील तक्रारदार आणि साक्षिदारांवरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांसह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा -

  1. सरकारची बदनामी करणं भोवलं ? ; आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा, लाडकी बहीण योजनेवरुन केला होता 'हा' आरोप - FIR Against Jitendra Avhad
  2. प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले! आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हे शिर्डीत वर्ग करण्याचे न्यायालयाचे निर्देश - Jitendra Awhad News
  3. जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' कृत्यामुळे भाजपा नेते, कार्यकर्ते आक्रमक; विविध जिल्ह्यात आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न - BJP Vs MLA Jitendra Awhad

ABOUT THE AUTHOR

...view details