महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जर्मन बेकरी स्फोटाला १५ वर्ष पूर्ण, स्फोटानंतर परिस्थितीच बदलली; पाहा काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी - GERMAN BAKERY BLAST

१५ वर्षांपूर्वी जर्मन बेकरीत स्फोट झाला होता. त्यावेळी किंकाळ्या उठल्या, लोक सैरावैरा धावत सुटले होते. लोकांचा आरडाओरड सुरु झाला. ही घटना प्रत्यक्षदर्शी विसरू शकलेले नाहीत.

GERMAN BAKERY BLAST
जर्मन बेकरी स्फोट (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2025, 10:33 PM IST

पुणे : सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या वीकमध्ये विविध डे साजरे केले जातात. १४ तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. १५ वर्षापूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी पुण्यातील कोरेगाव पार्क इथल्या जर्मन बेकरीत नागरिक बसलेले असताना संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास या ठिकाणी स्फोट झाला. या स्फोटात १७ लोक ठार झाले तर, ५८ लोक जखमी झाले. या घटनेला गुरूवारी (दि.१३) १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेला जरी पंधरा वर्ष पूर्ण होत असली तरी, ते दृश्य हा स्फोट बघणाऱ्या लोकांच्या अंगावर काटे आणत आहेत. एवढंच नव्हे तर, या स्फोटानंतर कोरेगाव पार्क इथल्या जर्मन बेकरी परिसरात विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.

नेमक काय झालं? कळालंच नाही : शंकर खरोसे यांनी जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटाची आठवण सांगितली. १३ फेब्रुवारी २०१० रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मोठा आवाज झाला. यावेळी मला काहीच कळलं नाही की, नेमकं काय झालं. मला वाटलं की, गॅस स्फोटाचा आवाज असेल पण, बेकरीत सगळं विचित्रच झालं होतं. बेकरीचं शेड खाली पडलं होतं. काचेचा खच इथं पडला होता. मी आत जाऊन गॅस सिलेंडर बघितलं तर, ते तसंच होतं. बेकरीमध्ये बघितलं तर, लोक इकड तिकडं पडले होते. बेकरीमध्ये असलेल्या काहींचा मृत्यू झाला होता. तर, काही लोक गंभीर जखमी झाले होते. आज देखील हा प्रसंग आठवला तर, अंगावर काटे येतात, अशी भयावह परिस्थिती प्रत्यक्षदर्शी शंकर यांनी सांगितली. त्यानंतर दोन वर्षे यातून सावरायला त्यांना लागली. अनेक दिवस झोप देखील लागत नसल्याचं ते म्हणाले.

स्फोटनंतर परिसरातील परिस्थिती बदलली : "स्फोट झाल्यावर कोरेगाव परिसरातील संपूर्ण परिस्थिती बदलली. सुरुवातीला एक- दोन वर्ष तर, कोणताही विदेशी नागरिक इथं येत नव्हता. तसंच आजही येणाऱ्या लोकांची तपासणी, चौकशी केली जाते. या परिसरात असलेल्या व्यवसायावर देखील याचा परिणाम झालाय. जे विदेशी पर्यटक पूर्वी इथं यायचे ते आता येत नाहीत. आता देखील खूप कमी लोक इथं येताना पाहायला मिळतात," असं शंकर खरोसे यांनी सांगितलं.

...त्यावेळी परिस्थिती भयावह होती : स्फोटाबद्दल सांगताना संतोष भोसले म्हणाले की, "मी इथलाच रहिवासी असून, पुढच्या गल्लीमध्ये माझं ऑफिस होतं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा, सगळं धुरानं काळं झालं होतं. बेकरीमध्ये बसलेले लोक रस्त्यावर आले होते. ते सर्वजण गंभीर जखमी होते. ते मदतीसाठी हाक मारत होते. मला जेवढं जमलं तेवढी मी लोकांची मदत केली. त्यावेळी परिस्थिती भयावह होती. आजही तो प्रसंग आठवला तर खूप वाईट वाटतं. अशा परिस्थितीत आम्ही जखमी लोकांना मदत केली."

काहीच कळत नव्हतं : "मी गेल्या ३० वर्षापासून हॉटेल बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडजवळ रिक्षा चालवतो. जेव्हा स्फोट झाला तेव्हा, काही लोक हवेत उडाले आणि रस्त्यावर येऊन पडले," असा भयावह प्रसंग रिक्षाचालक हनुमंत कुटे यांनी सांगितला. स्फोटाच्या आवाजानं माझे कान बधीर झाले होते. काय चाललं आहे? काय झालं? काहीच कळत नव्हतं. जेव्हा काही वेळानं भानावर आलो तेव्हा खूप भयावह परिस्थिती बघितल्याचं ते म्हणाले. या घटनेला १५ वर्ष पूर्ण झाली. परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जो व्यवसाय आधी व्हायचा, तसा आता होताना दिसत नाही. जे पूर्वी विदेशी पर्यटक या ठिकाणी येत होते, ते आता येत नाहीत. स्फोटानंतर कोरेगाव परिसरातील सगळी परिस्थिती बदलल्याचे रिक्षावाले म्हणाले.

हेही वाचा :

  1. मेळघाटात साडेतीनशे वर्ष पवार कुटुंबाची जहागिरी; कोट गावात टेकडीवरचा भग्न किल्ला साक्षीदार, पाहा व्हिडिओ
  2. राज्य अल्पसंख्याक आयोग 'अॅक्शन मोड'वर; २२ शाळांचा दर्जा काढण्याचे निर्देश
  3. संगीताचा वारसा सांगणाऱ्या 'हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल'चं शतक महोत्सवी वर्ष; आता बदलतोय पत्ता, वाचा स्पेशल रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details