नाशिक Nashik News : प्लास्टिक नावाचा राक्षस पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास करतोय. सरकार तसंच स्वयंसेवी संघटनांकडून याविषयी जनजागृतीही करण्यात येते. मात्र याचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही. आपल्या पर्यावरणाचं रक्षण ही आपली जबाबदारी आहे, या भावनेनं जोपर्यंत सान-थोर काम करत नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती 'जैसे थे'च राहणार, या सामाजिक भानातून नाशिकमधली एक महिला झटतेय. वय वर्ष फक्त सत्तरीपार! पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर नागरीकांनी करू नये, यासाठी नाशिकच्या आजीबाईं गेल्या पाच वर्षांपासून जागृती करत आहेत. स्वतःच्या हाताने कापडी पिशव्या शिवून सार्वजनिक ठिकाणी नागरीकांना त्याचं मोफत वाटप करत आहेत. मागील पाच वर्षात त्यांनी आतापर्यंत 12 हजारहुन अधिक पिशव्यांचे वाटप केलं आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक पिशवी विसरून कापडी पिशवी वापरण्यास लाज बाळगू नका, असा संदेश त्या कृतीतून देत आहेत.
12 हजार 500 कापडी पिशव्या वाटप :"पर्यावरण तुमच्या दारी, कापडी पिशवी तुमच्या घरी, मी विमल काशिनाथ स्वामी तुम्हाला संदेश देते". हा संदेश देत सत्तरीपार केलेल्या नाशिकच्या खुटवड नगर भागात राहणाऱ्या विमल स्वामी या आजीबाई तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेने पर्यावरण संरक्षणासाठी काम करत आहेत. समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती वाढीस लागावी. प्लॅस्टिक पिशव्यांची नागरिकांना झालेली सवय मोडावी आणि प्लास्टिक हद्दपार व्हावं असं विमल आजीबाईंना वाटतं. गेल्या पाच वर्षांमध्ये आजीबाईंनी तब्बल 12 हजार 500 कापडी पिशव्या, पाच हजार कापडी पाकिटे स्वखर्चाने तयार करून त्याचं मोफत वाटप केलं आहे. तसेच 70 प्रकारच्या बी बियाणांपासून तयार केलेल्या 7 हजारपेक्षा अधिक राख्यांचं त्यांनी वाटप केलं आहे. केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या आजीबाई उतरत्या वयातसुद्धा पर्यावरण विषयाची त्यांची असलेली आत्मीयेता सर्वांनाच प्रेरणादायी देणारे ठरणारी आहे.