महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 10:28 PM IST

ETV Bharat / state

भाजपा २५ जूनला पाळणार 'आणीबाणी एक काळा दिवस’ ; सर्व जिल्ह्यात राबवणार अभियान - Emergency a Black Day

Emergency a Black Day : २५ जूनला भाजपा राज्यभरात 'आणीबाणी एक काळा दिवस' पाळणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपाने कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी काळा दिवस पाळणार आहेत.

Emergency a Black Day
आणीबाणी एक काळा दिवस (File Photo)

मुंबई Emergency a Black Day : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला पायदळी तुडवित २५ जून १९७५ रोजी देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. या घटनेच्या कटू आठवणी स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्व जिल्हा स्तरावर जनजागृती प्रबोधनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, अभियानाचे संयोजक प्रदेश उपाध्यक्षद्वय जयप्रकाश ठाकुर आणि ॲड. धर्मपाल मेश्राम आणि उद्योग आघाडीचे संयोजक प्रदीप पेशकर यांनी दिली आहे.



‘आणीबाणी एक काळा दिवस’: भारतीय संविधानावरच मोठा प्रहार हा २५ जून १९७५ रोजी देशात लागू, आणीबाणी लागू करून करण्यात आला. हा निर्णय देशातील व्यक्तीस्वातंत्र्यावर एक मोठा आघात होता. म्हणून यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी व जनतेपुढे सत्य यावे, या हेतूने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीतर्फे ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक “विशेष अभियान” २५ जून रोजी हाती घेण्यात आले आहे. या अनोख्या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आणीबाणीचे क्रुर सत्य जनतेसमोर मांडतील. त्याचप्रकारे काँग्रेसकडून समाजामध्ये जे मनभेद आणि मतभेद निर्माण केले जात आहेत, संविधान बदलण्याचे जे नरेटिव्ह काँग्रेसनं तयार केले आहे, त्याबाबत सुद्धा नागरिकांना जागरूक केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर आयोजित या प्रबोधन कार्यक्रमाला जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहून देशातील काळ्या दिवसाचे सत्य जाणून घ्यावं, असं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं आहे.



येणारा पुढील धोका ओळखून घेण्यासाठी: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या या निर्णयामुळं हुकूमशाही शासनपद्धतीने जनतेला वेठीस धरले गेले. यामुळं भारतीय संविधानाच्या ४२व्या घटनादुरूस्तीने नागरिकांच्या मुलभूत हक्क, अधिकारावरच प्रहार केला. त्यामध्ये न्यायालय देखील हस्तक्षेप करू शकणार नाही, अशी तरतूद केली. मुळात हे देशाचे संविधानच संपविण्यासाठी काँग्रेसकडून केलेला कपोलकल्पीत प्रयत्न होता. अशा पद्धतीचे शासन करून जनतेला गुलाम बनविण्याची मानसिकता आजही काँग्रेस आणि त्यांच्या धुरीणांमध्ये दिसून येत असल्याकारणानं त्याबाबत नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. काँग्रेसच्या आणीबाणीच्या काळ्या इतिहासाबाबत जागृत होऊन येणारा पुढील धोका ओळखून घेण्यासाठी भाजपाच्या ‘आणीबाणी एक काळा दिवस’ या प्रबोधन अभियानात सामील होण्याचं आवाहन संयोजकांद्वारे करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. राहुल गांधींनी NDA सरकारच्या पहिल्या 15 दिवसांचा मागितला 'हिशोब'; घोटाळ्यांची यादी देत सरकारवर खरमरीत टीका - Rahul Gandhi
  2. निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती? विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर निवडणूक आयोग आणि ठाकरे गटात संघर्ष वाढण्याची शक्यता - Shivsena UBT vs EC
  3. "...तर जातीच्या नावावर रक्तपात सुरू होईल, विधानसभा निवडणुकीत मी रशिया युक्रेनचा प्रचार करणार"; राज ठाकरे असं का म्हणाले? - Raj Thackeray

ABOUT THE AUTHOR

...view details