महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाय दर्जाची सुरक्षा असतानाही बाबा सिद्दीकींची हत्या; विरोधकांकडून प्रश्न उपस्थित, सत्ताधारी काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेवर विरोधी पक्षांसह सत्ताधारी नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोण काय म्हणालं हे जाणून घेऊया...

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 2 hours ago

Ajit Pawar Sharad Pawar Jayant Patil Vijay Wadettiwar and other Political leaders reaction on ncp leader Baba Siddique murder
बाबा सिद्दीकी (ETV Bharat)

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसंच वाय दर्जाची सुरक्षा असतानाही सिद्दीकींवर तीन जणांंनी हल्ला केला. त्यामुळं विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हत्येचं कारण काय? : बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते. तसंच ते आमदार झिशान सिद्दीकी यांचे पिता होते. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच तीन अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्या. एक गोळी छातीत लागली. तर त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालादेखील एक गोळी लागली. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर अज्ञात आहेत.

अजित पवार काय म्हणाले? :"राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं ऐकून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावलाय. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. "या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळं अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावलाय. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे," असंही पवार आपल्या शोकसंदेशात म्हटले आहेत.

बाबा सिद्दीकींवर झालेला गोळीबार खेदजनक :या घटनेनंतर एक्सवर पोस्ट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी इतक्या सौम्यतेनं राज्याचा गाडा हाकणार असतील तर ही सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारुन सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो."

जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका :या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, "माझे मित्र मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब आहे. याआधी भाजपाच्या आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती. आता बाबा सिद्दीकी यांची हत्या."

सत्ताधारी पक्षातील नेतेच सुरक्षित नाहीत-"आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. पुण्यासारख्या शहरात गँगवॉर हे तर नित्याचे झालेत. त्यामुळं राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत, हे सतत अधोरेखित होतंय. आम्ही आधीपासूनच म्हणत आलोय की, महायुती सरकारनं महाराष्ट्राचा युपी बिहार केलाय. पण आता परिस्थिती त्यापेक्षाही वाईट झाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या निमित्तानं प्रश्न पडतोय की, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाच सरकार सुरक्षित ठेवू शकत नसेल तर महाराष्ट्रातील जनतेला तरी हे कसं सुरक्षित ठेवतील?"असा खोचक सवालही जयंत पाटील यांनी केला.

सरकारनंच गुन्हेगारांना पाठीशी घातलंय : याप्रकरणी एक्सवर पोस्ट करत कॉंग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. बाबा सिद्दीकी यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलंय. काँग्रेस पक्षात असताना सहकारी म्हणून आम्ही पक्षासाठी सोबत काम केलंय. बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला बळ हीच प्रार्थना. राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे, असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती. पण अलीकडं मुंबईत या घटना वाढत आहेत. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही. कारण, या सरकारनंच गुन्हेगारांना पाठीशी घातलंय. गुन्हेगारांना सरकार वाचवतं, एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो, ही गंभीर बाब आहे. याची चौकशी झाली पाहिजे", असं वडेट्टीवार म्हणालेत.

आदित्य ठाकरे काय म्हणाले? :यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, "बाबा सिद्दीकींची हत्या प्रचंड धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. यातून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीच स्पष्ट होत आहे. हे प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेचं अपयश आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

...तर विरोधकांना काय सुरक्षा देणार? :या घटनेसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना एमआयएम नेते वारिस पठाण म्हणाले की, "ही फार दुर्दैवी घटना आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळं माझं वैयक्तिक नुकसान झालंय. बाबा सिद्दीकी हे माझे फार चांगले मित्र होते. हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. जर सरकार त्यांच्या स्वत:च्या नेत्यांना सुरक्षा पुरवू शकत नसेल, तर मग विरोधकांसाठी काय सुरक्षा पुरवणार?", असा सवालही त्यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळीबारात हत्या; तीन हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या
Last Updated : 2 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details