महाराष्ट्र

maharashtra

वर्षाला 21 टन माती चालली वाहून; मातीचा एक इंच थर तयार व्हायला लागतात 100 वर्षे - Soil Erosion Problem Amravati

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 5:13 PM IST

Soil Erosion Problem Amravati : जशी पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे, तशीच मातीही (Soil) महत्त्वाची आहे. भारतातील निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र, अतिवृष्टीमुळं माती वाहून चालली आहे. मृदा संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी नेमकं काय करायला हवं यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती खास तुमच्यासाठी.

Soil Erosion Problem
पावसाच्या पाण्यामुळं माती चालली वाहून (ETV GFX)

अमरावती Soil Erosion Problem Amravati:कृषीप्रधान राष्ट्र असणाऱ्या भारतात शेतीसाठी सुपीक जमीन ही अतिशय मोलाची आहे. असं असताना केवळ पावसाच्या पाण्यामुळं देशात दरवर्षी 21 टन माती वाहून चालली आहे. मातीचा एक इंच थर तयार होण्यासाठी शंभर वर्ष लागतात. असं असताना मातीची होणारी धूप ही शेतीसाठी अत्यंत मोठा धोका आहे. एकूणच मातीच्या होणाऱ्या ह्या धूप संदर्भात अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील मृदा संधारण विभागातील प्राध्यापक 'डॉ. दीपक पाडेकर' यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मातीची धूप थांबवण्यासाठी नेमकं काय करायला हवं यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली.

माहिती देताना डॉ. दीपक पाडेकर (ETV BHARAT Reporter)



पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप : भारतात वाऱ्यापासून होणारी धूप आणि पाण्यामुळं होणारी धूप अशा दोन प्रकारे जमीनीची धूप होते. यापैकी पाण्यामुळं सर्वाधिक प्रमाणात मातीची धूप होते. महाराष्ट्रात प्रामुख्यनं मातीची होणारी धूप हा अतिशय महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. भारतात एकूण साडेतीनशे दशलक्ष हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी 147 दशलक्ष हेक्टर इतकी जमीन खराब झाली आहे. त्यापैकी 94 दशलक्ष हेक्टर जमीन ही पाण्यामुळं वाहून गेली. त्यातही पुराच्या पाण्यात 14 दशलक्ष हेक्टर जमीन वाहून गेली असं प्राध्यापक डॉ. दीपक पाडेकर यांनी सांगितलं.



महाराष्ट्रात अशी आहे परिस्थिती: महाराष्ट्रातील मातीही डेक्कनच्या पठारावरून तयार झाली असून राज्यात गाळाची जमीन आहे. महाराष्ट्राच्या जमिनीत मातीचे अगदी सूक्ष्म कण आहेत. महाराष्ट्रात जेव्हा पूर येतो त्यावेळी पाणी बरेच दिवस वाहते, ते जमिनीत मुरत नाही. यामुळं मातीचे सूक्ष्म कण वाहून जातात. 'आयसीएआर' अर्थात नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे लँड युज प्लॅनिंगच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण मातीपैकी 30 टक्के माती ही खराब झाली आहे. या 30 टक्क्यांपैकी 29 टक्के माती ही समुद्रात वाहून गेली. 61 टक्के माती ही एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी वाहून गेली. दहा टक्के मातीने शेततळी बुजवून टाकलीत. मातीची ही धूप फार मोठ्या प्रमाणात झाली.



शेत जमिनीवर असा झाला परिणाम : पाण्याची होणारी धूप यामुळं शेतातील मातीची गुणवत्ता घटली आणि त्यात असणाऱ्या सुपिकतेला नुकसान झाले. मातीच्या समृद्ध स्तरावरील पाणी साठवण्याची क्षमता यामुळं कमी झाली आहे. मातीच्या एकत्रीकरणात बिघाड होऊन मातीमधील अतिशय सूक्ष्म कणाचा थर वाहून गेला. अशा परिस्थितीत मातीची संरचना कमकुवत होत असून पोत देखील बदलतो. याचा विपरीत परिणाम मातीच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेवर होत असून पिक उत्पादन वाढ आणि उत्पन्न यावर मोठा परिणाम जाणवतो. अशा अवस्थेत खत कीटकाचे कोष कीटकनाशक हे देखील वाहून जात असल्यामुळं दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. मातीच्या धूपेमुळं मोठे तलाव जलवाहिन्या ह्या गाळाने भरून जातात आणि महापुरासारख्या समस्या उद्भवतात. यासह गाळामुळं गटार वाहिन्या, जलाशय हे देखील तुंबतात आणि मौल्यवान जमीन नष्ट होते.



जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाय : पाण्यामुळं होणाऱ्या जमिनीची धूप थांबवण्याकरता शेतात नांगरणी, पेरणी आधी मशागत करताना आडवी मात्र समपातळीत करावी. असं केल्यामुळं नांगराचा प्रत्येक तास वाहणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण करतो. यामुळं पाण्याला माती वाहून नेण्याइतका वेग राहात नाही. समतल मशागत पद्धतीमध्ये सर्व मशागत पेरणी आणि अंतर मशागत त्या क्षेत्राच्या समतल रेषेत करावी. यामुळं उताराला आडव्या अथवा समतल रेषेवर असंख्य छोट्या सऱ्या तयार होतात. अशा सरींमुळं उताराच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. तसंच पाणी जमिनीत मुरण्यास पुरेसा कालावधी मिळतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी सरींमध्ये साठवलं जातं.



डोंगरावरची माती वाचवण्याचा उपाय: वनसंवर्धनाकरताच्या डोंगराळ जमिनीत योग्य ठिकाणी जमिनीच्या उतारास आडवे 10 ते 12 मीटर अंतरावर सम पातळीवर चर काढून त्यातून निघालेल्या मातीच्या उताराच्या बाजूने भराव घालावा. नंतर चरींमध्ये त्या विभागात चांगली वाढणारी आणि जास्त उत्पादन देणारी झाडे लावावी. डोंगर उतारावर याप्रमाणे दहा ते बारा मीटर अंतरावर सम पातळीत अंतराने अर्धा गोलाकार खड्डे करून त्यातून निघालेल्या मातीने खड्ड्यांचा अर्धा भाग भरून त्यामध्ये त्या विभागात चांगली वाढणारी आणि उत्पन्न देणारी झाडे लावावी. झाडाच्या दोन पट्ट्यांमध्ये चांगल्या प्रकारच्या गवताची लागवड करावी. यामुळं डोंगर उतारावरून वाहून जाणाऱ्या मातीचं संरक्षण करता येतं.


माती वाचवण्यासाठी गवताचे महत्त्व : शेतातील गवत नष्ट करण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. खरंतर शेतात माती वाचवण्यासाठी गवत हे अतिशय महत्त्वाचं आहे. जमिनीच्या उतारास आडव्या पाच ते सहा मीटर अंतरावर सरी पाडून त्यात सुधारीत जातीच्या गवताचे बी टाकून ते नैसर्गिकरित्या वाढू दिल्यास त्यांचा झपाट्याने प्रसार होतो. या गवताच्या पट्ट्यात एका भागात जनावर चारण्यास सोडता येतात आणि इतर भागात गवत छान वाळू दिल्यास जमिनीची धूप कमी होते. यातून नैसर्गिक धूप होणारी जमीन तयार होण्याच्या क्रियेचा समन्वय साधता येतो अशी माहिती, प्रा. डॉ. दीपक पाडेकर यांनी दिली.

हेही वाचा -

  1. सावळापुरात 1861 साली सापडली 'सत्यनारायणाची मूर्ती'; दर्शनासाठी आले होते अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', जाणून घ्या मूर्तीचं रहस्य - Satyanarayan Temple
  2. साडेतीनशे वर्षांपूर्वी परदेशातील टाइल्स, झुंबरनं सजलं दिगंबर जैन मंदिर; अचलपूरचं आहे ऐतिहासिक वैभव - Jain Temples Amravati
  3. मुलगा अभियंता होण्यासाठी आई-वडिलांनी गहाण ठेवलं शेत; आज 'त्याची' व्यवसायात 60 कोटी रुपयांची उलाढाल, 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट - Nilesh Sabe Success Story

ABOUT THE AUTHOR

...view details