महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्य रेल्वेकडून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'; 'आरपीएफ'कडून मागील 4 महिन्यात तब्बल 116 बालकांची सुटका - Operation Nanhe Farishte

Operation Nanhe Farishte : मुंबईच्या मायानगरीची भुरळ अल्पवयीनांना आकर्षित करत असते. यामुळे अनेक जण घरून पळून जात मुंबई गाठतात. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गेली सात वर्षे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' ही मोहीम प्रभावीपणे राबवत आहे. याअंतर्गत 1 एप्रिल 2024 ते 23 जुलै 2024 या केवळ 4 महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय सुरक्षा दलाने एकूण 116 मुला मुलींची सुटका केली आहे. 'आरपीएफ'ची कौतुकास्पद कामगिरी दर्शविणारं हे वृत्त...

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 8:13 PM IST

Operation Nanhe Ferishte
'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'अंतर्गत सापडलेले बालक (ETV Bharat Reporter)

मुंबई Operation Nanhe Farishte: मुंबईला मायानगरी म्हणतात. त्याचं कारण म्हणजे, या शहराचा झगमगाट. इथं स्वप्न घेऊन येणारे अनेक जण आहेत. काहीतरी स्वप्न उराशी बाळगून अनेक जण आपलं घर सोडून मुंबई गाठतात. मात्र, यातील सर्वच जण 'सुजाण' असतात असं नाही. यात काही अल्पवयीन मुलं-मुली देखील असतात. आता सोशल मीडियामुळे तर मुंबईतील चमक-दमक, इथला झगमगाट, मुंबईची लाईफस्टाईल या अल्पवयीनांना आकर्षित करताना दिसते. त्यामुळे ही मुलं थेट मुंबई गाठतात आणि या मुलांच्या घरी शोधाशोध सुरू होते. मुंबईच्या या पॉश लाइफस्टाईलची भुरळ पडून घर सोडून मुंबईत येणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची संख्या कमी नाही. रेल्वेने मागील केवळ चार महिन्यात तब्बल 116 मुला-मुलींना आपल्या घरी सोडलं आहे.


मोहिमेला दिलं 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' नाव :घर सोडून आलेल्या या अल्पवयीन तरुण-तरुणींना त्यांच्या घरी पाठवण्याचं काम रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच 'आरपीएफ' करत आहे. 'आरपीएफ'च्या या विशेष मोहिमेला 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' असं साजेसं नाव देण्यात आलं आहे. रेल्वेच्या या मोहिमेंतर्गत मागील केवळ चार महिन्यांच्या काळात घर सोडून आलेल्या 116 मुलांची सुखरूप सुटका केली असून या मुलांना पुन्हा त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

कोणत्या महिन्यात किती बालकांची सुटका? :मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गेली सात वर्षे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' ही मोहीम प्रभावीपणे राबवत आहे. त्यामुळे अंतर्गत 1 एप्रिल 2024 ते 23 जुलै 2024 या केवळ 4 महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय सुरक्षा दलाने एकूण 116 मुला-मुलींची सुटका केली आहे. यात 73 मुलांचा समावेश असून 43 मुलींचा समावेश आहे. तपशीलवार आकडेवारी पाहिल्यास एप्रिल महिन्यात एकूण 15 जणांची सुटका करण्यात आली. यात 5 मुले तर 10 मुली होत्या. मे महिन्यात एकूण 37 जणांची सुटका करण्यात आली. त्यात 27 मुले आणि 10 मुली होत्या. जून महिन्यात एकूण 25 जणांची सुटका करण्यात आली. यात 16 मुले आणि 9 मुली होत्या. जुलै महिना अद्याप संपलेला नाही. मात्र, जुलै महिन्यात सर्वाधिक 39 जणांची सुटका करण्यात आली. यात 25 मुलं तर 14 मुली आहेत.

'ती' मुलं पालकांच्या स्वाधीन :याच आठवड्यात घडलेली घटना म्हणजे, मंगळवारी 23 जुलै रोजी मुंबई विभागाचे रेल्वे संरक्षण दल कर्मचारी मनीष गौर आणि तोडरमल यांना टिळक नगर स्टेशनवर 7 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी भिक्षा मागताना दिसली. मुलांना कुर्ला येथील रेल्वे संरक्षण दल चौकीत आणण्यात आलं. इथं ASI सलीम मुलानी यांनी या मुलांची विचारपूस केली आणि समुपदेशन केलं. त्यानंतर या मुलांची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण व महिला व बाल विकास उपक्रम, मुंबईच्या प्रतिनिधी गजाला शेख आणि गायत्री मोरे यांच्या उपस्थितीत मानखुर्द येथील बालकल्याण समितीसमोर बालकांना सादर करण्यात आलं. पुढं या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना बोलावून औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. कुर्ला स्थानकावर मोबाईल कव्हर विकणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाचीही सुटका करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.

आरपीएफ जवानाप्रति कृतज्ञता :याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, "घरात भांडण झाल्यानं किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन अथवा शहराचे ग्लॅमर इत्यादी कारणांमुळे ही मुलं आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येतात. ही मुलं प्रशिक्षित आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) जवानांना आढळतात. तेव्हा हे प्रशिक्षित कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करतात."आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या या सेवेबद्दल अनेक पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यासाठी 'नन्हे फरिश्ते' मोहीमेची गरज :मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी येत असतात. ही मुलं देखील याचाच एक भाग; मात्र काही मुलं आपल्या पालकांशी भांडण झाल्यानं घर सोडून मुंबईत येतात. तर, काहींना फसवून देखील मुंबईत आणलं जातं. ही मुलं या मायानगरीत आपलं बालपण हरवून बसतात. तर, काही मुलं चुकीच्या संगतीत आल्यानं वाईट मार्गाला लागतात. काही वेळा वाईट मार्गाला लावली जातात; मात्र ज्या तरुण पिढीला आपण देशाचं भविष्य म्हणतो ही पिढी पुन्हा एकदा योग्य मार्गावर यावी यासाठी रेल्वेची 'नन्हे फरिश्ते' मोहीम उपायकारक ठरताना दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Jaipur Mumbai Train Firing: चेतन सिंहच्या साहित्यिक भाषेमुळे गोळीबाराचे कारण उलगडेना! ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत होणार चौकशी
  2. Mumbai Train Firing : जवान गोळीबारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल, आरोपीला उद्या न्यायालयात हजर करणार
  3. RPF Jawan News : सोलापूर रेल्वे स्टेशनवरील आरपीएफ जवानांनी सीपीआर देऊन वाचवले प्रवाशाचे प्राण

ABOUT THE AUTHOR

...view details