महाराष्ट्र

maharashtra

T20 विश्वविजेत्या भारतीय संघाला महाराष्ट्र सरकारकडून 11 कोटींचे बक्षीस, विधान भवनात महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार - T20 world champion Indian team

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 8:22 PM IST

T20 world champion team : महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं T20 विश्वविजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा सत्कार विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आला. यावेळी खेळाडूंनी मराठीत भाषण करून उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी भारतीय क्रिकेट संघाला राज्य सरकारकडून 11 कोटी रुपयांचं बक्षीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

T20 world champion team
खेळाडूंचं स्वागत करताना मुख्यमंत्र्यांसह इतर सदस्य (Etv Bharat Reporter)

मुंबई T20 world champion team :विश्वविजेता T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघातील मुंबईकर असलेल्या कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार राज्य सरकारच्या वतीनं विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

भारतीय संघाला 11 कोटी :यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारही खेळाडूंचं कौतुक केलं. तसंच भारतीय क्रिकेट संघानं अभूतपूर्व अशा खेळाचं दर्शन करून विश्वचषक जिंकला आहे. यापुढंही याच पद्धतीनं ते कामगिरी करतील, अशी अशा व्यक्त करीत भारतीय संघाला राज्य सरकारतर्फे 11 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करीत असल्याचं त्यांनी सांगितलं.

खेळाडूंचे जंगी स्वागत :विधानमंडळ परिसरात खेळाडूंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भारताचे झेंडे, खेळाडूंच्या स्वागताचं बॅनर लावण्यात आलं होतं. लेझीम पथकाद्वारे खेळाडूंचं विधान भवनात स्वागत करण्यात आलं. यावेळी महिलांनी खेळाडूंचं औक्षण करून स्वागत केलं. विधिमंडळाचा मध्यवर्ती सभागृह आमदार, सचिव, पत्रकारांनी तुडुंब भरलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडेंसह आमदार उपस्थित होते. खेळाडू सभागृहात दाखल होताच सर्वांनी रोहित शर्मा, सूर्याकुमार यादव यांच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं घोषणा दुमदुमल्या.

मुंबई पोलिसांचं कौतुक :सत्कार प्रसंगी बोलताना खेळाडू सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या झेलचं सर्वांनी कौतुक केलं. त्याला उत्तर देताना सूर्यकुमार यादव म्हणाला "की तो झेल माझ्या हातात सहज बसला. परंतु काल मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईकरांनी आमचं स्वागत केलं. गर्दीचं योग्य व्यवस्थापन, नियोजन करणाऱ्या मुंबई पोलिसांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मुंबईकरांचं, तसंच इतर भारतीयांचं खूप प्रेम मिळत असून आता पुढील विश्वचषक आपण जिंकणारच, असा विश्वास सूर्यकुमारनं बोलून दाखवला.

'नाहीतर त्याला बसवलं असतं':मुंबईकर असलेल्या सूर्यकुमार यादव पाठोपाठ रोहित शर्मानं मराठीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी बोलताना रोहित म्हणाला, "मुंबईकरांकडून, राज्य सरकारकडून मिळालेल्या आदराचे आभार. काहीही करून यावेळी विश्वचषक जिंकायचाच असा निर्धार आम्ही केला. यावेळी मला मिळालेला संघ हा खूप चांगला संघ होता. त्याचाच परिणाम विश्वचषक जिंकण्यात झाल्याचं तो यावेळी म्हणाला. सूर्यकुमार यादवच्या झेलबाबत तो म्हणाला, तो झेल हातात बसला असं सुर्यकुमार म्हणाला. जर तो झेल बसला नसता, तर मी त्याला बसवलं असतं, असं म्हटल्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

तर विकेट गेली असती फडणवीस :यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत अभूतपूर्व झालेल्या खेळाडूंच्या स्वागताचं रूप पाहून थोडावेळ धडकी भरल्याचं सांगितलं. कारण चुकून जर एखादी अप्रिय घटना घडली असती, तर आपली विकेट गेली असती, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. क्रिकेटमध्ये जसा डकवर्क लुईस आहे, तसा राजकारणातही डकवर्थ लुईसचा नियम आहे. आमच्या इथेसुद्धा विजयाची सरासरी ही अशीच ठरते, असं ते म्हणाले.

'हे' वाचलंत का :

  1. टी २० विश्वविजेता टीम इंडियाचा मुंबईत विजयोत्सव, लाखो क्रिकेटप्रेमी उतरले रस्त्यावर - Team India Mumbai Victory Parade
  2. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर अनेकांना भोवळ; मरीन ड्राईव्हवर काय होती परिस्थिती? - Team India Mumbai Victory Parade

ABOUT THE AUTHOR

...view details