महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

2 रन 6 विकेट... शरद पवारांच्या मैदानावर 'लॉर्ड' ठाकूरची गोलंदाजीत हॅटट्रिक; मेघालयची शरणागती; पाहा व्हिडिओ - SHARDUL THAKUR

रणजी ट्रॉफीच्या मागच्या सामन्यात मुंबईकडून खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरनं फलंदाजीनं धुमाकूळ घातला. आता त्यानं गोलंदाजीत कहर केला आहे.

Shardul Thakur
शार्दुल ठाकूर (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 30, 2025, 12:53 PM IST

मुंबई Shardul Thakur : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्यानं आपल्या कामगिरीनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईकडून खेळताना त्यानं रणजी ट्रॉफीच्या मागच्या सामन्यात फलंदाजीत धुमाकूळ घातला. शार्दुलनं जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावलं होतं. आता त्यानं गोलंदाजीत कहर केला आहे. खरं तर, आजपासून 30 जानेवारी रोजी सुरु झालेल्या मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्यानं हॅटट्रिक घेतली आणि त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे मेघालय संघ पूर्णपणे पराभूत झाला. त्याचा अर्धा संघ फक्त 2 धावांवर बाद झाला.

हॅटट्रिक घेणारा मुंबईचा पाचवा गोलंदाज : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून हॅटट्रिक घेणारा शार्दुल ठाकूर हा फक्त पाचवा गोलंदाज आहे. त्याच्या आधी, मुंबईच्या 4 गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे, ज्याची सुरुवात जहांगीर खोतनं केली होती. 1943-44 च्या हंगामात त्यानं बडोद्याविरुद्ध ही कामगिरी केली. त्यांच्यानंतर, उमेश नारायण कुलकर्णीनं 1964-65 च्या हंगामात गुजरातविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि अब्दुल इस्माइलनं 1973-74 च्या हंगामात सौराष्ट्रविरुद्ध हॅटट्रिक घेतली. त्यानंतर रॉयस्टन डायसनं 2023-24 हंगामात बिहारविरुद्ध हा पराक्रम केला. आता शार्दुल ठाकूरनं मेघालयविरुद्ध या विक्रमांची पुनरावृत्ती केली आहे.

शार्दुलमुळं मेघालय अडचणीत : मुंबई आणि मेघालय यांच्यातील हा सामना शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यानं शार्दुल ठाकूर आणि मोहित अवस्थी यांच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी सोपवली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर निशांत चक्रवर्तीला बाद करुन शार्दुलनं मेघालयला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकात मोहितनं एक विकेट घेतली. यानंतर तिसऱ्या षटकाची पाळी आली.

कशी घेतली हॅटट्रिक :तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूंवर शार्दुलनं 1 धाव दिली. आता धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात 2 धावा होत्या. त्यानंतर त्यानं चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग तीन विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण केली आणि मेघालय संघाचा अर्धा भाग पॅव्हेलियनमध्ये पाठवला. यानंतरही विकेट्सचा क्रम सुरुच राहिला. परिणामी मेघालयचा डाव अवघ्या 86 धावांत संपुष्टात आला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरनं 4 तर मोहित अवस्थीनं 3 विकेट घेतल्या.

हेही वाचा :

  1. T20, T10, द हंड्रेड नंतर आता क्रिकेटचा आणखी एक नवा फॉरमॅट; भारतात होणार मॅचेस
  2. ICC क्रमवारीत भयंकर उलथापालथ; तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्तीची लॉटरी

ABOUT THE AUTHOR

...view details