महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानमुळं 1882 नंतर क्रिकेटला पाहायला मिळालं 'हे' दृश्य; क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यादाच 'असं' घडलं

पाकिस्तान आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रावळपिंडीत सुरु झाला, ज्यामध्ये पुन्हा एकदा फिरकीपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं.

PAK vs ENG 3rd Test
पाकिस्तान क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 25, 2024, 10:15 AM IST

रावळपिंडी PAK vs ENG 3rd Test : अनेक सामने गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटमध्ये विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली. पाकिस्तानी संघानं मुलतान इथं खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. ज्यामुळं पाकिस्ताननं हा सामना जिंकला, तेच सुत्र रावळपिंडीत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही राबवण्यात आलं. त्याचाच परिणाम असा झाला की तब्बल 142 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये एक विशेष दृश्य पाहायला मिळालं. शेवटच्या कसोटीप्रमाणे या सामन्यातही पाकिस्ताननं आपल्या फिरकी जाळ्यात इंग्लंडला अडकवलं आणि असं घडलं की संपूर्ण डावात एकाही वेगवान गोलंदाजानं एकही चेंडू टाकला नाही, जे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा घडलं आहे.

पाकिस्तान फिरकीपटूंवर अवलंबून : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवार 24 ऑक्टोबरपासून पिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरु झाला. चर्चा आणि अपेक्षेप्रमाणे या सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवर केवळ फिरकीपटूंनाच मदत मिळाली. पाकिस्ताननं दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी आक्रमणाच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केलं होतं, जो फेब्रुवारी 2021 नंतर घरच्या मैदानावर त्यांचा पहिला कसोटी विजय होता. नोमान अली आणि साजिद खान या फिरकी जोडीनं पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. दोन्ही गोलंदाजांनी त्या कसोटीत इंग्लंडच्या सर्व 20 विकेट (दोन्ही डाव एकत्र) घेतल्या. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात फक्त या दोघांनीच गोलंदाजी केली.

फिरकीपटूंनी केली पुर्ण गोलंदाजी : अशा स्थितीत तिसऱ्या कसोटीतही पाकिस्तानी संघानं हाच फॉर्म्युला स्वीकारत दोन्ही फिरकीपटूंसह गोलंदाजीला सुरुवात केली. याचा फायदा पाकिस्तानलाही मिळाला आणि इंग्लंडचा संघ अवघ्या 267 धावांत गारद झाला. यात दोघांनी 42 षटकं सतत गोलंदाजी केली, त्यानंतर प्रथमच गोलंदाजीत बदल करण्यात आला, परंतु नंतर एक फिरकी गोलंदाज जाहिद महमूद आणि काही काळानंतर दुसरा फिरकी गोलंदाज सलमान अली आगा याला गोलंदाजी करायला लावली.

142 वर्षानंतर दिसला हा दिवस : इंग्लंडनं एकूण 68.2 षटकं फलंदाजी केली आणि ही सर्व षटकं चार फिरकी गोलंदाजांनी टाकली. अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदाच असं घडलं की, एकाही वेगवान गोलंदाजानं एका सामन्याच्या पहिल्या डावात एकही चेंडू टाकला नाही. यापूर्वी 1882 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉय पामर आणि एडविन इव्हान्स यांनी इंग्लंडविरुद्ध सलग 115 षटकं (प्रत्येकी 4 चेंडू टाकून) टाकली होती. म्हणजेच हा दिवस 142 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला.

पाकिस्तानलाही नुकसान : या सामन्यात पुन्हा एकदा पहिल्या डावाचा स्टार ऑफस्पिनर साजिद खान होता, ज्यानं 6 बळी घेतले. साजिदनं गेल्या कसोटीच्या पहिल्या डावात 7 विकेट घेतल्या होत्या. तर मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात 3 बळी घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज नोमान अलीनं इथंही पहिल्या डावात तितक्याच विकेट घेतल्या. लेगस्पिनर जाहिद महमूदला एक विकेट मिळाली. मात्र, खुद्द पाकिस्तानची स्थिती चांगली नव्हती आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 73 धावांत केवळ 3 विकेट्स गमावल्या होत्या. फरक एवढाच होता की इंग्लंडसाठी फिरकीपटूंनी 2 बळी घेतले तर वेगवान गोलंदाजानं 1 बळी घेतला.

हेही वाचा :

  1. भारताच्या 'या' पराक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी पाकिस्तानला लागली 60 वर्षे; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' चौथ्यांदा घडलं
  2. 1329 दिवसांनी संघात परतलेल्या वॉशिंग्टनच्या 'सुंदर' फिरकीत अडकले किवी फलंदाज, 51 वर्षात दुसऱ्यांदा 'असं' घडलं

ABOUT THE AUTHOR

...view details