महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

4331 दिवसांनी भारतीय संघानं पाहिला सर्वात लाजिरवाणा दिवस... 69 वर्षांनी न्यूझीलंडनं रचला इतिहास

भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला.

New Zealand Won 1st Test Series on Indian Soil
न्यूझीलंड क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 26, 2024, 3:56 PM IST

Updated : Oct 26, 2024, 4:17 PM IST

पुणे New Zealand Won 1st Test Series on Indian Soil : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यामुळं ही कसोटी मालिकाही भारतानं गमावली. न्यूझीलंडनं मालिकेत इतिहास रचला आणि 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. त्याचवेळी, न्यूझीलंडनं भारताला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच भारतीय संघाची भारतात सलग कसोटी मालिका जिंकण्याची मालिकाही खंडित झाली आहे.

12 वर्षांनंतर कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर पराभव : हा पराभव भारतासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. वास्तविक, भारतानं 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यापूर्वी 2012-13 च्या भारत दौऱ्यात इंग्लंडनं भारतीय संघाचा कसोटी मालिकेत पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय संघाचं घरच्या मैदानावर वर्चस्व होतं. त्यांनी सलग 18 मालिका जिंकल्या होत्या, मात्र आता ही विजयी मालिका थांबली आहे. त्याचवेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं घरच्या मैदानावर चौथा कसोटी सामना गमावला आहे. भारतात सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा तो आता संयुक्तपणे दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे.

69 वर्षांनी पहिला मालिका विजय : न्यूझीलंड संघ 1955 पासून भारत दौऱ्यावर येत आहे. परंतु त्यांनी भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र आता काळ बदलला आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या युवा संघानं 69 वर्षांचा दुष्काळ संपवून इतिहास रचला आहे. 69 वर्षांनंतर पहिल्यांदाच कीवी संघानं भारतातच कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडनं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप : या सामन्यात न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तोही योग्य ठरला. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 259 धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 156 धावाच करु शकला. या काळात एकाही फलंदाजाला 40 धावांचा आकडाही स्पर्श करता आला नाही. यानंतर न्यूझीलंडनं दुसऱ्या डावातही शानदार कामगिरी करत 255 धावा केल्या. अशा परिस्थितीत भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी 359 धावांचं लक्ष्य मिळालं. मात्र यशस्वी जैस्वाल वगळता एकही फलंदाज या डावात जास्त काळ टिकू शकला नाही, त्यामुळं भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांना दुसऱ्या डावात केवळ 245 धावा करता आल्या आणि लक्ष्यापासून 113 धावांनी ते दूर राहिले.

मिचेल सँटनरच्या जाळ्यात अडकले भारतीय फलंदाज : या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो स्टार फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर. पुण्याच्या खेळपट्टीवर त्यानं अप्रतिम कामगिरी केली. दोन्ही डावात त्याला 5 विकेट्स घेण्यात यश आलं. मिचेल सँटनरनं या सामन्याच्या पहिल्या डावात 53 धावा देत 7 फलंदाजांना आपले बळी बनवले. त्याचवेळी दुसऱ्या डावातही मिचेल सँटनरची जादू कायम राहिली. त्यानं दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला स्वबळावर विजय मिळवून दिला.

हेही वाचा :

  1. पाकिस्ताननं फक्त 19 चेंडूत जिंकला कसोटीत सामना, मालिकाही जिंकली; फिरकीच्या जाळ्यात अडकले इंग्रज
  2. यशस्वीचा पुण्यात महापराक्रम; 147 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा जगातील दुसराच फलंदाज
Last Updated : Oct 26, 2024, 4:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details