महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेतून बाहेर पडल्यास, कोण होणार भारताचा कर्णधार?

भारतीय क्रिकेट संघाला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचं आहे. ज्यात 22 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमधील 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होणार आहे.

By ETV Bharat Sports Team

Published : 5 hours ago

rohit sharma
रोहित शर्मा (Getty Images)

मुंबई Rohit Sharma IND vs AUS Series : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतील पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. रोहितनं वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयला ही माहिती दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

न्यूझीलंडविरुद्ध खेळणार तीन कसोटी सामने : बांगलादेशला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार आहे. 16 ऑक्टोबरपासून ही कसोटी मालिका सुरु होणार असून यामध्ये 3 सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका फक्त भारतातच खेळली जाणार आहे आणि प्रत्येकजण त्याची वाट पाहत आहे. पण सर्वात उत्सुकता आहे ती बॉर्डर-गावस्कर स्पर्धेची, जिथं भारतानं मागील सलग दोन ऑस्ट्रेलियन दौऱ्यांवर मालिका जिंकली आहे. यावेळी मालिकेत 4 ऐवजी 5 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत, परंतु यापैकी एका सामन्यात भारतीय संघाला कर्णधाराशिवाय खेळावं लागू शकतं.

अहवालात दावा काय : भारतीय कर्णधाराने याबाबत बीसीसीआयला माहिती दिल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये तर दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडीलेडमध्ये सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत अहवालात म्हटलं आहे की, सध्या याबाबतची परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नाही. सूत्रानं सांगितलं की, भारतीय कर्णधारानं आपल्या परिस्थितीबद्दल बोर्डाला माहिती दिली आहे आणि म्हटलं की तातडीच्या वैयक्तिक कारणांमुळं त्याला एका कसोटीतून बाहेर राहावं लागेल. मात्र, हे वैयक्तिक प्रकरण कसोटी मालिकेपूर्वी सुटल्यास तो पाचही कसोटी सामने खेळू शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. याबाबतची परिस्थिती येत्या काही दिवसांत मंडळाला स्पष्ट होईल, असंही सूत्रानं सांगितलं. आता यादरम्यान कर्णधार कोण होणार हा प्रश्न आहे.

जसप्रीत बुमराह : भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हातात होती आणि उपकर्णधारपद जसप्रीत बुमराह सांभाळत होता. वर्षाच्या सुरुवातीला तो इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा उपकर्णधार होता. मात्र बांगलादेश कसोटी मालिकेत बीसीसीआयनं त्याला पदावरुन हटवलं. रोहितच्या जागी बुमराहला यापूर्वी एकदा कर्णधारपदाची संधी मिळाली आहे.

ऋषभ पंत : भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋषभ पंतची प्रतिभा सर्वांनाच माहिती आहे. पंतनं याआधीही परदेशात आपली दहशत पसरवली आहे. अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणूनही त्याचं वर्णन केलं आहे. त्याची तुलना एमएस धोनीशी केली जाते, अशा परिस्थितीत पंतही कर्णधारपदाचा मोठा दावेदार असू शकतो.

केएल राहुल : स्टार फलंदाज केएल राहुलनं काही कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. पण सध्या राहुल त्याच्या वाईट टप्प्यातून जात आहे. केएल राहुलला बांगलादेशविरुद्ध मोठी खेळी खेळण्यात यश आलं नाही. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी न्यूझीलंड मालिकेत राहुलला संधी मिळू शकते. राहुलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवड झाली, तर कर्णधारपदासाठी तो नक्कीच चांगला पर्याय ठरु शकतो.

हेही वाचा :

  1. 823/7... इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उभारला धावांचा हिमालय; क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात 'असं' फक्त चारवेळा झालं

ABOUT THE AUTHOR

...view details