मुंबई - अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आणि 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी झाल्यानंतर त्याच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ताज्या घडामोडीनुसार सलमानच्या घरासमोर तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. नव्या धमकीनंतर तेथे चोवीस तास सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एक धमकीचा संदेश आला होता, ज्यामध्ये अभिनेता सलमान खानने "लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी" 5 कोटी रुपयांची मागणी केली होती.
मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळ असल्याचा दावा केला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास सलमानचा जीव धोक्यात घालण्याचा दावाही करण्यात आला आहे. मेसेज पाठवणाऱ्यानं म्हटलंय की, या मेसेजला हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचे असेल तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल." राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सलमानला धमकीची ही घटना घडली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या भयानक धमकी मागे कोण आहे याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत.