ठाणे Bhim Jayanti 2024 : मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील लोकवस्तीत स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचे हाल होत होते. मात्र ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून रस्ता तयार करुन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. ही अनोखी भीमजयंती शहापूर तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील 22 घरांची वस्ती तसेच 121 लोकवस्ती असलेल्या आळण पाड्यावर साजरी करण्यात आली. श्रमजीवी संघटना पदाधिकारी आणि आळण पाडा येथील संघटनेचे सभासदांनी पाडा ते मुख्य रस्त्याला जोडणारा 500 मीटर अंतर असलेला रस्ता श्रमदानातून तयार केला. या अनोख्या अभिवादनाच्या उपक्रमामुळे जिल्हात या श्रमदानचं कौतुक होत आहे.
![Bhim Jayanti 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-04-2024/mh-tha-1-shahapur-1-bayet-2-vis-2-photo-mh-10007_14042024183011_1404f_1713099611_1087.jpg)
स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षानंतरही नाही रस्ता : शहापूर तालुक्यातील 29 आदिवासी वाड्या आणि पाड्यांना वनविभागाची जमीन असल्यानं रस्ते तयार करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून श्रमजीवी संघटना रस्ते तयार करण्यासाठी सुख सुविधा दावे दाखल करुन पाठपुरावा करत आहे. परंतु 29 पैकी 15 गावांना सुख सुविधा दावे मान्य झाले असून आजही 14 आदिवासी पाड्यांचे दावे प्रलंबित आहेत. त्यापैकीच आळण पाडा ही आहे. वन्यजीव राखीव वने जमीन असल्यानं सुख सुविधा दावे मान्य करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच आचार संहिता लागू असल्यानं याही वर्षी रस्ता होणार नाही. त्यामुळं पावसाळ्यातील चार महिने वांद्रे येथील आश्रम शाळेत जाणारे विद्यार्थी, गरोदर महिला, आजारी व्यक्ती, आणि नागरिकांना यापुढंही पायी आणि चिखलातूनच प्रवास करावा लागणार, असं नागरिकांच्या लक्षात आलं.
![Bhim Jayanti 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-04-2024/mh-tha-1-shahapur-1-bayet-2-vis-2-photo-mh-10007_14042024183011_1404f_1713099611_130.jpg)
रस्ता तयार करुन बाबासाहेबांना अनोखं अभिवादन : श्रमजीवी पदाधिकाऱ्यांनी 14 एप्रिलला पाड्यातील महिला, पुरुष, तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांसह भीमजयंती साजरी केली. यावेळी श्रमजीवी संघटना पदाधिकाऱ्यांनी वनविभाग, तहसील, पोलीस स्टेशन यांना पत्र व्यवहार करून सकाळी 8.30 वाजता पाड्याचा रस्ता श्रमदानानं तयार केला. या कार्यक्रमासाठी श्रमजीवी संघटना पदाधिकारी मालु हुमणे, प्रकाश खोडका, रुपेश आहिरे, किरण भोईर, अंकुश दोडके, मारुती भवर, गावंजी पारधी, ग्रामस्थ संदिप आळण, नितीन आळण, मानसी भुरकूड, गीता आळण, रविंद्र आळण, कल्पना सुकाड, मनिषा बारात, छाया आळण आदी गावकऱ्यांनी श्रमदान केलं.
हेही वाचा :