मुंबई Sanjay Raut News today: दिल्लीतील निती आयोगाचा बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माईक बंद करण्यात आला. त्यांना बोलू दिलं नाही. यामुळे देशभरात चांगलंच राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. महाराष्ट्राच्या वाट्यालाही या बैठकीतून काही मिळाले नसल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
मोदी - शाह यांच्या गुजरातमधून पैसा येत नाही: खासदार राऊत म्हणाले, " ज्या पद्धतीने बजेट तयार करण्यात आलं, त्याच पद्धतीनं निती आयोग काम करतो. भाजपाची सत्ता असलेल्या ठिकाणी पैसे देण्याचं काम करण्यात आलं आहे. म्हणून अनेक मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घातला. पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या बैठकीत बोलू दिलं नाही. त्यांचा माईक बंद करून त्यांना अपमानित करणं, हे लोकतंत्रात शोभत नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत आमचेसुद्धा माईक बंद केली जातात. केंद्र सरकार आपली खुर्ची वाचवण्यासाठी आंध्रप्रदेश आणि बिहारला भरभरून निधी देत आहे. हा अधिकार सर्व राज्यांचा आहे. वाटण्यात येणारा पैसा देशातील जनतेचा आहे. टॅक्सच्या माध्यमातून उभा झालेला पैसा आहे. तो मोदी आणि शाह यांच्या गुजरातमधून येत नाही." राज्याला कमी निधी मिळत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. " या बैठकीत महाराष्ट्राला काय भेटलं? मुख्यमंत्री गेले आणि दाढीवर हात फिरवून परत आले, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
पवार, फडणवीस, शिंदे यांच्या नाट्यसृष्टीनं महाराष्ट्राचं नुकसान: अजित पवार यांनी सत्तेत सामील होताना अमित शाह यांच्याबरोबर दहावेळा बैठक घेतल्याचं वक्तव्य केलं. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कधी उडी घालून, कधी फर कॅप घालून तर कधी तोंडाला मुखवटे घालून हे दिल्लीत कोणाकोणाला भेटत होते? याचाच अर्थ यांचे राजकारण महाराष्ट्र संदर्भात किती पूर्वीपासून चालू होतं? हे हळूहळू उघड होत आहे. महाराष्ट्राला नाटकाची फार मोठी परंपरा आहे. अगदी बालगंधर्वपासून डॉक्टर श्रीराम लागू, नाना पाटेकर, प्रशांत दामले पर्यंत मोठे कलाकार हे या नाट्यसृष्टीला भेटले आहेत. त्या नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. या तिघांना सुद्धा रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण ते इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगामामंच्यावर राजकारणात काम करत आहेत."
वेश बदलून अहमद पटेल यांना भेटायचे- "अजित पवार एखाद्या गुप्तहेराप्रमाणे नाव आणि टोप्या बदलून खोट्या मिशा लावून दिल्लीत अमित शाह यांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रात्री वेश बदलून सरकार पाडायची चर्चा करायचे. सांगायचे की लोकं त्यांना ओळखत नव्हते. म्हणजे यांनी किती हुबेहूब मेकअप केला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. या कलाकारांनी आपल्या नाट्यसृष्टीचं फार मोठं नुकसान केलं आहे. एकनाथ शिंदे हे खोट्या कथा लिहून सिनेमा काढत आहेत. एकनाथ शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना वेश बदलून अहमद पटेल यांना भेटायला जायचे," असा टोलाही त्यांनी लगावला.
लाडक्या बहिणींचा उद्धार कसा करणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेवर बोलताना राऊत म्हणाले, "महाराष्ट्रावर ८ लाख कोटींचं कर्ज आहे. या ८ लाख कोटींच्या कर्जातून हे आपल्या लाडक्या बहिणींचा उद्धार कसा करणार? ते त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण राज्यातील अर्थ खात्यानx त्यावर आक्षेप घेतला आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे. तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना कुणालाही विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद भेटणार नाही. दुसरंच नाव समोर येईल, "असा इशारा त्यांनी दिला.
पीयूष गोयल यांनी खोटं बोलू नये: शरद पवार यांनी माफी मागावी, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पीयूष गोयल यांच्यावर काय आरोप आहेत, हे आम्हाला सांगायला लावू नका. शरद पवार आताच बोललेले नाहीत. ते सत्तेत असतानासुद्धा बोललेले आहेत. अमित शाह यांना तडीपारची नोटीस बजावली होती की नाही? त्यांना गुजरातमधून हद्दपार केलं होतं की नाही? ते तुरुंगात होते की नाही? अमित शाह यांच्यावरील खुनाचा खटला गुजरातच्या बाहेर चालवावा, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की नाही? पीयूष गोयल यांनी इतकंही खोटं बोलू नये की लोकं त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून हसतील, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.
हेही वाचा