ठाणे : अभिनेता सैफ अली खानच्या घरात 15 जानेवारीला चोर शिरला होता. त्या चोरानं सैफ अली खान यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी हल्लेखोर चोराला पकडण्यासाठी 35 पोलीस पथकं निर्माण केली होती. घटनेच्या तिसऱ्या दिवशी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपी मोहम्मद शरीफुलला अटक केली. त्यापूर्वी रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. परंतु त्याला चौकशी करून सोडून दिलं. या घटनेनंतर त्या तरुणासह कुटुंबाला मानसिक धक्का बसला. यामुळे माझा मुलगा वेडा झाला असून त्याला आता नोकरी कोण देणार? असा प्रश्न उपस्थित करून त्याचं जीवन पोलिसांच्या चुकीमुळं उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्याचे वडील कैलाश कनोजिया यांनी केला आहे. तर, आकाश कनोजिया (३१) असं त्या तरुणाचं नाव आहे.
...म्हणून बसला मानसिक धक्का : मिळालेल्या माहितीनुसार, आकाश कनोजिया हा टिटवाळा इथल्या नांदप गावातील इंदिरानगर भागातील चाळीत आई वडिलांसह राहतो. घटनेच्या दिवशी कल्याणहून मुळगावी (छापा,छत्तीसगड) इथं जात होता. त्याचवेळी त्याला दुर्ग रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याला सोडून दिलं. मात्र, त्याला पोलिसांनी खातरजमा न करताच ताब्यात घेतल्यानं त्याच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.
माझ्या मुलाला काम कोण देणार? : अशा प्रकारच्या गुन्ह्यात माझ्या मुलाला आरोपी केल्यानं माझ्या मुलाला कोणी कामावर ठेवत नाही. मुंबई पोलिसांनी हा तोच आरोपी आहे का? याची खातरजमा करायला पाहिजे होती. माझ्या मुलासोबत जे घडलं ते चुकीचं आहे. या घटनेचा, पोलिसांच्या वागण्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला आहे. कामात त्याचं मन लागत नाही, तो वेडा झाला आहे. तो आमच्याशी सुद्धा नीट बोलत नाही. अनेक जण हेच सांगत होते की, फोटोमधील व्यक्ती आणि माझ्या मुलात कुठेच साधर्म्य नाही. असं म्हणत आकाशच्या वडिलांनी त्यांचा संताप व्यक्त केला. त्यांची ही कैफियत आता कोण ऐकणार का? आकाशचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य कधी सुरळीत होणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
हेही वाचा :