पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या 12 वीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झालीय. पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा तणावमुक्त द्यावी, यासाठी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून साखर वाटून स्वागत करण्यात आलंय.
राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रांवर परीक्षा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षा उद्यापासून 11 फेब्रुवारी ते मंगळवार 18 मार्च 2025 या कालावधीत पार पडणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,10,348 मुले, 6,94,652 मुली आणि 37 ट्रान्सजेंडर आहेत. एकूण 10,550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलीय.
जीबीएससंदर्भात देखील घेण्यात आली खबरदारी : यावेळी परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी म्हणाले की, आजपासून आमची परीक्षा सुरू होतेय. परीक्षेची तयारी पूर्ण झालीय. पण कुठेतरी दडपण आहे. पाहिलं पेपर असल्याने मनात भीती आहे, पण तेही आता शिक्षकाकडून औक्षण झाल्यावर ते दूर झालंय आणि निश्चितच चांगल पेपर जाईल, असं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस या आजाराचे रुग्ण हे वाढत असून, बारावीच्या परीक्षेसाठी देखील याबाबत खबरदारी घेण्यात आलीय. जे विद्यार्थी परीक्षेसाठी येणार आहेत, त्यांनी स्वतः पिण्याची बॉटल घरून आणावी. तसेच इतरांचे पाणी कोणीही पिऊ नये, अशी खबरदारी घेण्यात आलीय.
ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. तसेच परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली गेलीय. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल आणि जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके उपलब्ध होतील, याचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित घटकांची तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. तसेच Maharashtra Prevention Of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
हेही वाचा :