नागपूर Sharad Pawar Press Conference : वर्धा लोकसभा मतदारसंघात अमर काळे यांनी आज (2 एप्रिल) महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर यवतमाळमधून संजय देशमुख यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. वर्धात स्वतः शरद पवार हे अमर काळे यांना पाठबळ देण्यासाठी उपस्थित होते. तर, यवतमाळ येथे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी संजय देशमुखांसाठी प्रचार सभा घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं.
नेमकं काय म्हणाले शरद पवार : यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, "दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या सभेमध्ये अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. त्यावेळी सर्वांची एकच भावना होती की, देशात लोकशाहीवर हल्ला होतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. देशाच्या घटनेवर सातत्यानं हल्ले सुरू असल्यामुळं आम्ही आघाडी केली. देशाच्या संविधानावर हल्ला होतोय, ही अत्यंत गंभीर बाब आहे." तसंच येणाऱ्या दिवसांमध्ये अजून काही नेत्यांना तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. त्यामुळं येणाऱ्या दिवसात स्थिती अधिक बिघडू शकते, अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केली.
यंदा देशाचा इरादा वेगळा : पुढं ते म्हणाले की, "2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितसोबत अल्पसंख्यांक समाज आणि त्यांचे नेते होते. आता त्यांच्यासोबत कोणी नाही. माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की अल्पसंख्यांक कोणाला विजयी करायचंय, यापेक्षा कोणाला पराभूत करायचंय याचा विचार करतात. यंदा देशाचा इरादा वेगळा आहे. भाजपाला जो उमेदवार पराभूत करू शकतो, अशा उमेदवारालाच लोक मतदान करतील."
देवेंद्र फडणवीसांनाही लगावला टोला : यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत शरद पवार म्हणाले की, "महाराष्ट्रात एक नेता आहे, ज्यानं पाच वर्षांपूर्वी प्रत्येक सभेत शरद पवार संपले आहेत, असं म्हटलं होतं. मात्र, निकाल आल्यानंतर स्थिती अशी होती की आम्ही आमच्या सहकाऱ्यांसह अडीच वर्ष सरकार चालवलं, आणि तेव्हा ते नेते विरोधी पक्षात बसले." पुढं बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात विचारण्यात आलं असता पवार म्हणाले की, बारामतीत अजून निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली नाही. मतदान व्हायचं आहे. मतदानानंतर लोकांचा कल कळेल. यापूर्वी सुप्रिया सुळे जिंकल्या आहेत, आणि भविष्यातही त्याच जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी सोडण्यापूर्वी एकनाथ खडसे माझ्यासोबत चर्चा करतील : एकनाथ खडसे परत भाजपात जाऊ शकतात अशी चर्चा सातत्यानं सुरू आहे. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, एकनाथ खडसे यांचं दोन दिवसांपूर्वीचं मी एक वक्तव्य वाचलं होतं. ज्यात ते म्हणाले होते की, राजकीय दृष्टीनं कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर मी शरद पवार यांच्याशी चर्चा करणार. पण अजून त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही."
हेही वाचा -
- केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षडयंत्र; सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप - Lok Sabha Elections
- बारामतीत कोणाची दिसणार 'पॉवर'? आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखलेल्या मतदारसंघात काका-पुतण्यामध्येच प्रतिष्ठेची लढाई - Baramati Lok Sabha Constituency
- अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर 'इंडिया आघाडी'ची निदर्शनं; उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित - INDIA Alliance Protest