यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे दहा दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे आता यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथील संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे.
सोमवारपासून या शहरातील बाजारपेठ सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिक तसेच व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र पांढरकवडा, पुसद आणि दिग्रस येथे पॉझेटिव्ह रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता या शहरातील लॉकडाऊन सात दिवस कायम राहणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी बाजारपेठ उघडी असतांना व सायंकाळी 5 नंतर कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, बाहेर जातांना मास्कचा वापर करावा, आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे.
विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आलेल्या यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले नाही, विनाकारण गर्दी केली आणि पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली तर मग प्रशासनासमोर शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याने सर्वांनी याचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.