यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील वासरी येथे एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सुभाष कायतवर असे शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतात खत टाकत असताना सुभाष कायतवर यांच्यामागे वाघ लागला. जीव वाचवण्यासाठी कायतवर झाडावर चढले. मात्र, वाघाने झाडावरही त्यांच्यावर झडप घालून त्यांना जखमी केले. कायतवर यांच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. हा वाघ तब्बल एक तास झाडाखाली थांबून राहिला. शेतकऱ्याने मोबाईलवरून मदतीसाठी गावकऱ्यांना फोन केला. त्यानंतर गावकऱ्यांनी कायतवर यांची सुटका केली.


मागील अनेक दिवसांपासून पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावात या वाघाने दहशत निर्माण केली आहे. मागील सहा महिन्यात दहा पाळीव जनावरांची शिकार केली आहे. तर काही दिवसांपूर्वी वनविभागाचे अधिकारी आणि गावकरी यांची बैठक पार पडली होती.