यवतमाळ : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुहेरी हत्याकांडाच्या प्रयत्नातून (attempted double murder in Yavatmal) चुलत भाऊ ठार (Cousin killed ) झाला आहे. तर हल्ल्यात काका गंभीर जखमी झाला आहे. बोअरच्या वादातून ही घटना घडली असता आरोपीने सख्खा चुलत भाऊ आणि काकावर लोखंडी सळईने हल्ला चढवत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेत चुलत भावाचा मृत्यू झाला असून मारेकरी पसार झाला आहे.(Yavatmal Crime)
काय आहे प्रकरण : राहूल नरेंद्र पाली (27) रा. पांढरकवडा मार्ग, यवतमाळ असे या हत्याकांडात ठार झालेल्या चुलत भावाचे आणि नरेंद्र जगन्नाथ पाली (60) रा. पांढरकवडा मार्ग, यवतमाळ असे गंभीर जखमी काकाचे तर सूरज पाली (35) रा. पांढरकवडा मार्ग, यवतमाळ असे संशयित पसार मारेकऱ्याचे नाव आहे. नरेंद्र पाली आणि सूरज पाली हे दोघे शेजारी आहेत. नरेंद्र पाली याने घराचे बांधकाम सुरू केले. आज मंगळवारी दुपारी त्याच्या घराच्या आवारात बोअर खोदण्याचे काम सुरू होते. दरम्यान, बोअरच्या जागेच्या वादातून नरेंद्र आणि पुतण्या सूरज या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला जाऊन चुलत भाऊ राहूलनेही या वादात उडी घेतली. त्यानंतर संशयित आरोपी सूरजने दोघांवरही लोखंडी सळाखीने हल्ला चढविला.
नरेंद्रची प्रकृती गंभीर : या हल्ल्यात राहूल आणि त्याचे वडील नरेंद्र असे दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. काही क्षणातच राहूल घटनास्थळी ठार झाला. राहूल ठार झाल्याचे लक्षात येताच संशयित मारेकरी सूरजने घटनास्थळाहून पळ काढला. जखमी नरेंद्र आणि मुलगा राहूल याला नातेवाईकांसह नागरिकांनी तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी चाचपणी करून राहूलला मृत घोषित केले. गंभीर जखमी नरेंद्रवर शासकीय रुग्णालयाच्या अतीदक्षतागृहात उपचार सुरू आहे. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, शहर ठाणेदार नंदकिशोर पंत, अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर एसपी बनसोड यांनी शहर ठाणेदार पंत यांना तपासाच्या टिप्स दिल्या. शहर पोलिसांनी पंचनामा करून राहूलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मात्र, या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.
रक्ताचे नातेवाईक झाले वैरी : पूर्वी यवतमाळात टोळी युद्धातून आणि गुन्हेगारी वर्तुळातील वर्चस्वाच्या स्पर्धेतून हत्याकांड व्हायचे. त्यातूनच यवतमाळ शहरातील अनेक टोळ्यांमधील सक्रिय गुन्हेगार यमसदनी गेले. अनेक टोळ्यांची शकले उडाली. त्यामुळे खुनाच्या आणि शरीर दुखापतींच्या घटना येथील गुन्हेगारी वर्तुळात काहीशा प्रमाणात कमी झाल्या. असे असले तरी आता कौटुंबिक वादातून अनेक रक्तरंजित घटनांना मुर्तरुप दिले जात आहे. नव्हेतर कौटुंबिक वादातूनच रक्ताचे नातेवाईक एकमेकांचे वैरी झाल्याचे चित्र दुहेरी हत्याकांडाच्या प्रयत्नाच्या या घटनेवरून दिसून येते.