वाशिम - नवसाचा देव अशी ओळख असलेल्या अवलिया महाराज यांच्या 132 व्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यातील 'काळामाथा' येथे भव्य महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. अवलिया महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांनी महाप्रसाद घेत गाडा ओढून अवलिया महाराजांचा नवस फेडला.
हेही वाचा - 'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही'
काळामाथा येथील अवलिया महाराज हे देवस्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी भाविक याठिकाणी येतात. अवलिया महाराज यांच्या समाधीस्थळी नवस बोलल्यास पूर्ण होतो, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे याठिकाणी नवस बोलण्यासाठी अनेक भाविक गर्दी करत असतात. संकल्पपूर्ती झाल्यानंतर पुढच्या वर्षी येणाऱ्या यात्रेमध्ये काळामाथा येथे येऊन भाविक नवस फेडत असतात.
नवस फेडणाऱ्यांची व नवस कबूल करणाऱ्या भाविक भक्तांची संख्याही दरवर्षी वाढतच आहे. काही भाविक पायी, तर काही भाविक गाडा ओढून नवस फेडतात. काही भाविक पुरणपोळीचा नैवेद्य अवलिया चरणी अर्पण करतात. यावर्षी ही यात्रा औरंगाबाद-नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूने भरली असून आपला नवस करण्यासाठी लाखो भाविक काळामाथा येथे दाखल झाले होते.