वर्धा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्य शासनाचे कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याचे धोरण आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्याला पीक कर्ज मिळाले नाही असे होऊ नये. बँकांनी अपात्र केलेल्या पीककर्ज प्रकरणांची नोडल अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.
पाालकमंत्र्यांनी तालुकास्तरावर जाऊन बँकांना भेटी दिल्या. तहसील कार्यलयात जाऊन पीक कर्ज प्रकरणांचा बँक शाखेनिहाय आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त कापूस खरेदी करून राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. पीक कर्ज वाटपात सुद्धा जिल्हा राज्यात प्रथम आणावा, यासाठी येत्या दोन दिवसात पीक कर्ज प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश बैठकीत दिले.
बँकांनी अपात्र ठरविलेल्या पीककर्ज प्रकरणांची यादी बँकांकडून प्राप्त करून घ्यावी. तालुकास्तरावर तहसील, सहायक उपनिबंधक, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा परिषदचे कृषि अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून तपासावी. प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने नेमून दिलेल्या बँक शाखांना भेटी द्याव्यात. बँकांनी कोणत्या कारणाने कर्जप्रकरणे अपात्र ठरविल्यास त्रुटी पूर्ण करण्यास बँकांना सांगावे. तसेच शेतकऱ्यांवरील इतर कर्जामुळे पीक कर्जाची प्रकरणे अपात्र ठरविली असल्यास ओटीएसमध्ये स्थानांतरण करून पिककर्ज प्रकरणे मंजूर करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री केदार यांनी दिल्या.
नोडल अधिका-यांनी बँकांना भेटी देताना शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती घ्यावी. बँक खात्यात रक्कम जमा न झालेली प्रकरणे, तसेच ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाची सुध्दा तपासणी करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी पालकमंत्री सुनिल केदार यांनी जाम येथील बँक ऑफ इंडिया, हिंगणघाट येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांना भेटी देऊन पिक कर्ज प्रकरणांची चौकशी केली.
सेलू येथे झालेल्या बैठकित आमदार समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, तहसिलदार महेद्र सोनवने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बिरेद्र कुमार उपस्थित होते. तर समुद्रपूर येथे उपविभागिय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तसेच हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा, वर्धा येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, तहसीलदार प्रीती डूडुलकर उपस्थित होते.