वर्धा - निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती जुगार होऊन बसली आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना तोंड देणारा जुगार ज्यात नेहमी शेतकरी पराभूत होतो. एकदा निसर्गाची सटकली की बाजारात लाखमोलाचे विकले जाणारे पीक मातीमोल होऊन बसते. या पिकाला न योग्य भाव मिळतं न बाजारपेठ. जिल्ह्यातील शेतकरी सध्या अवकाळी पाऊस आणि गरपिटीमुळे अशाच संकटाला तोंड देत आहे.
आर्वी आणि कारंजा तालुक्यात गारपीट झाली असली तरी अवकाळी पाऊस सर्वत्र बरसला आहे. यात आर्वी तालुक्यातील शिरपूर येथील युवा शेतकरी धीरज पखाले यांची १० एकर शेती आहे. यातील दोन एकरात त्यांनी केळीची लागवड केली होती. पण, गारपिटीने केळीची बाग मोडली. केळीचे घड जमिनीवर पडले. ६० ते ७० हजाराचे नुकसान झाले. कोणतेही सरकार आल्याने काही फरक पडत नाही. कसेतरी जगतो आहे, अशा शब्दात त्यांनी आपले दुःख मांडले.
मोहम्मद हारून मोहम्मद सुभान यांची ८ एकर स्वतःची शेती आहे. त्यांनी जवळपास ४७ एकर शेती मकत्याने करत जुगार खेळला. रोज दिवस-रात्र मेहनतीने पीक उभे केले. पण, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे आता शेताकडे जाण्याची इच्छाही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाने साथ दिली असती तर १० लाखापेक्षा अधिक उत्पन्न झाले असते. पण, गारपिटीने १४ एकरातील कपाशी मातीमोल झाली. त्याचबरोबर, २० एकरातील १५ एकर चना खराब झाला. यंदा शेतीच्या जुगारात हरलो. यात ६ ते ७ लाखाचे नुकसान झाले. पण, अजून शेतापर्यंत नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणीच आले नसल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी आशा मोहम्मद हारून यांनी व्यक्त केली आहे.
हीच परिस्थिती जिल्ह्यातील गहू, चना, संत्रा, भाजीपाला पिकांची झाली. चिरंजीव भुतडा यांची ९ एकरात तूर पेरली. मागील वर्षी एकरी ९ पोते तूर झाली होती. यंदा मात्र ३ पोते होते की नाही ही शंका आहे. तुरीवर असलेले नैसर्गिक कवच गारपीट आणि पावसाने निघून गेले. यामुळे आता तूर सोकायला लागते. तुरीचा दाणा हा आता लहान असल्याने वाढ न होता तसाच वाढून जाईल. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील शेतकरी संदीप पोटे, नवनीत होले, सतीश डोंगरे यांचेही तूर, कपाशी, भेंडी आणि कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला असून लाखो रुपयांचे पीक मातीमोल झाले. पण, आता तुटपुंजी मदत देऊन थट्टा न करता भरगोस मदत देऊन पुन्हा गाढा उभा करायला मायबाप सरकारने हातभार लावावा, अशी आशा शेतकरी लावून बसले आहेत.
हेही वाचा- एटीएम मशीन चोरट्यांची टोळी सक्रिय, वर्ध्यात पुन्हा आढळले एक मशीन