वर्धा - मागच्या काही काळात स्वार्थी लोकांमुळे काँग्रेसची मोठया प्रमाणत पिछेहाट झाली. काँग्रेसमधील लढाकू संघर्ष करणारी वृत्ती आज लुप्त झाली आहे. काँग्रेसची ताकद असलेली सामान्य जनता ती काँग्रेसपासून निराश होऊन दूर झाली. त्यांना परत आणण्यासाठी उपाययोजना करावी लागेल. काँग्रेसच्या दुर्दशेला कोणी दुसरे तिसरे जवाबदार नसून, काँग्रेसमधील स्वार्थीपणाने जगणारे लोक याला जवाबदार असल्याचा आरोप महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे.
तुषार गांधी यांनी पत्रकारांशी बोलतांना काँग्रेसच्या आजच्या परिस्थिती वर भाष्य केले. ते वर्ध्यात गांधी 150 निमित्य आयोजित व्याख्यानमालेसाठी आले होते. सावंगी येथेही 'बा कस्तुरबा' या विषयावर व्याख्यानातून त्यांनी इतिहासातील अनेक बाबींचा उलगडा केला. काँग्रेस ही एका दिवसात मागे गेली नाही. मी आणि माझे एवढेच बघणारे नेतृत्व काँग्रेसमध्ये शिल्लक राहिले होते. अनेकांनी आपला स्वतःचा गड सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतर भागाकडे दृलक्ष केले. याचेच हे परिणाम आहेत.
काँग्रेसला यातून बाहेर पडासाठी लढवय्या नेतृत्वाची गरज आहे. त्यापेक्षा अधिक सांगायचे झाले तर सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. समाजाच्या तळागळात असलेला संपर्क आज तुटलेला आहे. त्यामुळे राहुल ने राजीनामा दिलाय तो काँग्रेसच्या भल्यासाठीच दिला असावा. काँग्रेसची जवाबदारी एका व्यक्तीच्या किंवा परिवारावर अवलंबून राहू नये, ती एकत्रित हवी आहे. कदाचित या निर्णयामुळे चांगले काही निघू शकेल असे तुषार गांधी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, राहुल गांधींनी नव्या दिशेने एक वाटचाल सुरू केली आहे. पण जोपर्यंत काँग्रेसमधूनच जवाबदार नेतृत्व उभारणार नाही, तोपर्यंत एक परिवार किंवा एक व्यक्ती काहीच करू शकत नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसला गरज आहे ती युवा लढाकू ऊर्जावान, अनुभवी भविष्याची दिशा दाखवणारे, काँग्रेसचा इतिहास, विचारधारेशी जोडून ठेवणारे पण सामूहिक असे नेतृत्व पाहिजे. सध्यातरी काँग्रेसमध्ये असा एकही चेहरा दिसत नाही. जो हे एकटा सांभाळू शकेल. आज एआयसीसी आहे सीडब्लूसी सारख्या कमिटी आहे. यासारखी पण नवीन गतिशील वेगवान तळागळातील लोक असणारी त्यात युवा नेता लढाकू वृत्ती असलेली दुर दृष्टिकोन असणारी कमिटीची स्थापना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.