वर्धा - कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात आहे. भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवून हा कापूस खरेदी करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी यासह विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. मूठभर कापूस जाळून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने कापूस तसाच शिल्लक राहिला. आता मात्र, खरेदी सुरू झाली असली तरी यात एफएक्यूची अट टाकून हा कापूस नाकारला जात आहे. एका दिवसात 50 गाड्या कापूस खरेदीची अट असताना मोजक्याच वाहनातील कापूस खरेदी होत आहे. त्यामुळे एफएक्यूसोबत लांब, मध्यम आणि आखूड धाग्याचा कापूस खरेदी करावा. कापूस खरेदीची गती वाढवावी. सरकार कापूस खरेदी करू शकत नसेल तर भावांतर योजना अंमलात आणावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कापूस जाळून निषेध केला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले. आंदोलनात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, मधुसुदन हरणे, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशिकर, शैलजा देशपांडे, शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, महिला आघाडी अध्यक्षा गीता खांडेभराड, युवा अघाडी अध्यक्ष सतिश दाणी, प. म. महिला आघाडी अध्यक्ष सीमा नरोडे, उ.म. विभाग प्रमुख शशिकांत भदाने आदींनी सहभाग घेतला.