वर्धा : वर्ध्यात महावितरणतर्फे ग्रामपंचायत स्तरावर जाऊन लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात त्रिसूत्रीच्या ‘एक गाव एक दिवस’ या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यात जिल्ह्यातील सर्वच भागात उपक्रम राबवत 361 तक्रारी सोडवून ग्राहकांना दिलासा देण्यात आला.
जिल्ह्यातील विजेबाबतच्या समस्या सोडवण्याचा नाविण्यपूर्ण उप्रकम विद्युत महावितरणने हाती घेतला. यात एकाच दिवसात वीज यंत्रणेच्या देखभाल, वीज बिलामुळे उद्भवलेल्या प्रश्नाचे निराकरण, नवीन वीज जोडणी यासारखा त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात आला. वीज देयकाशी निगडित 272 तक्रारी तर तांत्रिक बाबींच्या 89 तक्रारींचा समावेश होता. यामध्ये आर्वी विभागातील सर्वाधिक 139 तक्रारी आल्या आणि त्याचे निराकरण करण्यात आले. यात वर्धा विभागात 88 तक्रारी, तर 45 तक्रारी हिंगणघाट उपविभागात सोडवण्यात आल्यात. पुलगावच्या विजयगोपाल येथे 47 तक्रारी आष्टी उपविभागातील अंतोरा येथे 43 तक्रारींचे निवारण करण्यात आले. पिंपरी येथे एका दिवसात 43 तक्रारींचे निवारण करण्यात आले.
यात अनेक ठिकाणी त्रिसूत्री मोहिमेत वीज वितरणच्या वतीने रोहित्रात तेलाची पातळी वाढवणे, तारांमधील झोल काढणे, वीज खांबाला रंगकाम करणे, स्पेअर पार्ट बदलणे, वीज पुरवठाला अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून विद्युत तारा वेगळ्या करणे. इंसुलेटर बदलवणे, वितरण पेटीची स्वच्छता करणे, बोर्डवरील किटकॅट बदल करणे, नादुरुस्त धोकादायक सर्व्हिस वायर बदलणे आदी कामांचा समावेश होता. यासोबतच सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, विज देयक मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढून देणे, यासारखी कामेसुद्धा करण्यात आली. यामध्ये गाव पातळीवर वरिष्ठ अधिकारीसुद्धा जाऊन पोहचल्याने नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या समस्यांचे निराकरण झाल्याने गावकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले.
ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यासाठी कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, संजय वाकडे, हेमंत पावडे, दिलीप मोहोड, यांच्यासह उपकार्यकरी अभियंता नितीन उज्जैनकर, अभियंता विकास महल्ले, यांच्यासह वीज वितरणचे अभियंत्यापासून लाईनमन यांची उपस्थिती होती. या सर्वांनी सर्व एकाच दिवशी हजर राहून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.