वर्धा - जिल्ह्यातील गिरड येथील प्रसिद्ध फरीद टेकडीवरील दर्गाहला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सुमारे १३ भाविक जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.
बाबा फरीद दर्गाह येथे रविवारी दर्शनासाठी येणाऱया भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचप्रमाणे आज चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील चिंचोळकर कुटुंबीय हे स्वत:च्या वाहनाने (एम एच २९ एटी झिरो ०८१२) दर्गाहाला येत होते. या वाहनामध्ये एकून २५ भाविक प्रवास करत होते. दरम्यान, त्यांचे वाहन फरीद टेकडीवर आले असता, त्यांच्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन जागीच पलटी झाले.
अपघातात राजू विठ्ठल चिंचोळकर तसेच रजनी संजय चिंचोळकर अशा १३ जणांना दुखापत झाली. सुरुवातीला जखमींना गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जास्त जखमी असणाऱ्या दोघांना समुद्रपूरला पाठवण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र ठाकूर, दीपक निंबाळकर यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनाला रस्त्याच्या बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अरुंद रस्त्याने वळणावर होतो अपघात, निधी मंजूर
बाबा फरीद यांच्या दर्गाहला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, या तिर्थ स्थळाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरील वळणार नेहमीच अपघाताच्या घटना घडल्या आहेत. भाविकांची गर्दी पाहता हा रस्ता अरुंद ठरत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी २ कोटी ४८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले आहे.
जानेवारी महिन्यातही असाच एक अपघात झाला होता. यावेळीही अनेक भाविक जखमी झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा हा अपघात झाला आहे. दरम्यान, वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी हा रस्ता बंद करण्याची मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने भाविकांच्या जीवाशी खेळ होतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.