ठाणे - डेंगूचा सुळसुळाट सुरू झाला डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात उल्हासनगरमध्ये एका तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने बळी गेला होता, त्यापाठोपाठ कल्याणमध्येही डेंग्यूमूळे अजून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुन्हा एकदा पालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
शुभम अर्जुन शिंदे (२२) असे निधन झालेल्या तरुणाचे नाव असून तो कल्याणच्या पश्चिमेला गणेश नगर परिसरात राहत होता. दोन दिवसांपासून त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे २:३० ला उपचारादरम्यान त्याचे निधन झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गणेशनगर परिसरात स्वच्छता व फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तर, येथील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे कालच मेंदूज्वराच्या आजाराने दोन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे पालिका आरोग्य विभागाने तातडीने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजना राबवण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.