ठाणे - भिवंडी शहरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याला पकडून त्याला केलेल्या मारहाणीमध्ये एका चोरट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील बालाजीनगर परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अजय वर्मा (वय २९), अश्रफ खान (वय २४), सूरज वर्मा (वय २७) असे चोरट्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर समसुद्दीन मोहम्मद शेख (वय २६ रा. लाहोटी कंपाउंड) असे मृत चोरट्याचे नाव आहे. मृत व्यक्तीवर चोरी व घरफोडीसारखे चार गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
मोबाईल चोरी चोरट्याच्या जीवावर बेतली
भिवंडी शहरातील बालाजीनगर परिसरामध्ये असलेल्या एका खानावळीत बुधवारी पहाटे दोन चोरटे चोरीच्या उद्देशाने गेले. एक चोरटा खानावळीच्या बाहेर दुचाकीवर उभा राहिला व दुसरा खानावळीचे शटर उचकटून आत शिरला होता व येथील कामगाराचे मोबाईल तसेच बॅग घेऊन जात असताना शटरचा आवाज आल्याने खानावळीमध्ये झोपलेल्या कामगारांनी चोराला बाहेर निघत असताना पाहिले व आरडाओरडा करून कामगारांना तसेच मालकाला उठवून चोराला पकडले व त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, साथीदार मित्र पकडला गेला असल्याचे समजताच बाहेर उभा असलेला चोरटा आपल्या दुचाकीवरून पळून गेला. मात्र, झालेल्या मारहाणीत समसुद्दीन शेख यास वर्मी मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर मारहाण झालेल्या समसुद्दीन यास भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाण व हत्येप्रकरणी पोलिसांनी खानावळ मालक व त्याच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत तिघांनाही अटक केली असून पुढील तपास नारपोली पोलीस करीत आहे.