ठाणे - महाविकास आघाडीचे सरकार हे फसवा-फसवीचे सरकार आहे. आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांचीच फसवणूक केल्याची जोरदार टीका, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. भाजप नेते सीताराम राणे यांनी ठाण्यात भरवलेल्या मालवणी महोत्सवाला देशमुख यांनी भेट दिली.
निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची भरपाई देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने घूमजाव केले. सत्तेत येऊन दोन महिने उलटले तरी हे सरकार अजून अस्थिर असल्याची टीका देशमुख यांनी केली.
हेही वाचा - सत्ता गेल्याने विरोधकांची अवस्था पाण्याबाहेर पडलेल्या माशा सारखी, बाळासाहेब थोरातांचा टोला
मागील अनेक वर्ष ठाण्यात मालवणी महोत्सव भरवणाऱ्या सीताराम राणेंचे त्यांनी कौतुक केले. हा महोत्सव म्हणजे एक चळवळ असून यामुळे अनेक छोट्या उद्योजकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. देशमुखांनी महोत्सवातील अनेक खाद्यपदार्थांच्या दुकांनाना भेट दिली आणि तेथील रुचकर पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते हजर होते.