ठाणे : दिवंगत आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित शनिवारी ठाण्यातील शक्तिपीठावर शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच धर्मवीर आनंद दिघे यांच्या खारकर आळी येथील आनंद आश्रमात शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिननिमित्त शक्तीस्थळ फुलाने सजविला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते २५ रुग्णवाहिका वितरित केल्या गेल्या.
त्याच्या उलटा अर्थ समजायचा: शरद पवार मोठे नेते आहेत. ते सकाळी एक म्हणाले आणि दुपारी एक म्हणाले. मात्र पवार जे बोलतात त्याच्या नेमके उलट अर्थ लावायचा असतो. आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत आहे. या देशाच्या विकासाबाबतच अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. कालच चंद्रयानची मोहीम यशस्वी झाली. महासत्तेकडे आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. त्याकडे एक पाऊल पडलं आहे. काल जे अजित पवार यांना पटले ते हळूहळू शरद पवारांनाही पटेल असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुन्हा मोदीच पंतप्रधान: मुंबईत इंडियाची बैठक आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बैठक कुठेही झाली, कितीही लोक आले तरी या देशाने मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. 2014 साली सुद्धा असेच सगळे एकत्र आले होते. 2019 साली सुद्धा एकत्र आले होते. त्यामुळे कितीही विरोधक एकत्र आले तरी 2024 साली सगळे विक्रम मोडीत निघतील आणि जनता मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा प्लॅन होता: महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात गिरीश महाजन, नवनीत राणा, कंगना राणावत यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न झाला. मलाही काही गोष्टी माहिती आहेत. देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा प्लॅन खरा होता. मात्र आज सीबीआयने 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' करून टाकले. त्यांना क्लीनचिट मिळाली. त्यामुळे त्या काळात सत्तेचा दुरुपयोग कोण करत होतं आणि आज कोण कोणावर आरोप करतयं हे उघड झालं आहे. जनता सगळं बघत आहे. योग्य वेळेला योग्य उत्तर त्यांना दिलं जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अनेकांनी केले शिवसेनेत प्रवेश: धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर आलेल्या मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अनेकांनी शिवसेनेत दाखल झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई, ठाणे यांच्यासह चांदवड आणि कळवण येथील उद्धव ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. चांदवड शिवसेना शहर प्रमुख संदीप मधुकर उगले, चांदवड नगरपरिषद उपनगराध्यक्ष कविता संदीप उगले, नगरसेवक बाळू वाघ, निखिल राऊत, उपशहर प्रमुख दीपक शिरसाट, कळवण महिला आघाडी शहर प्रमुख सत्यवती आहेर, अर्चना पगार, वैशाली सोमवंशी, सीमा पगार, महिला आघाडी शाखाप्रमुख कळवण सविता पगार, महिला आघाडी उप तालुका प्रमुख सोनल येवला, गुजर, महिला आघाडी गटप्रमुख ऐशी, महिला आघाडी गणप्रमुख प्रतिभा गोसावी, रोहिणी मैंद, रेखा जाधव, यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. तर अकोला शहरातून उपमहापौर आणि अकोला जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा, जिल्हा परिषद सदस्य आणि उप जिल्हाप्रमुख ज्ञानदेव परनाटे, नगरसेवक मनपा आणि उपशहर जिल्हाप्रमुख शहर संघटक संतोष अनासने, उपजिल्हा प्रमुख आणि कामसेना प्रादेशिक सचिव देविदास बोदळे, माजी अकोला उपशहर प्रमुख वैभव चौधरी, विभाग प्रमुख राजेश मिशे, प्रसिद्धी प्रमुख गोटू अग्रवाल यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
हेही वाचा: