नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे उरण परिसरातील एका गोडाऊनमध्ये 600 टन कांदा सडला आहे. त्यामध्ये दुर्गंधी परसली असून या सडलेल्या कांद्यात किडेही पडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
उरणमधील वेश्वी गावाच्या हद्दीमध्ये सडक्या कांद्यामुळे नागिरीकांना होत असणाऱ्या त्रासाकडे स्थानिक प्रशासनचे दुर्लक्ष होत आहे. येथील नागरिकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे नागरिक भयभीत असताना तुर्की येथून आयात केलेला 600 टन कांदा नागरिकांमध्ये रोगराई पसरवत आहे. उरण वेश्वी गावाच्या हद्दीमध्ये गोदामांमधून आयात केलेला कांदा साठा करून ठेवण्यात आला होता. मात्र, आता हा कांदा सडल्याने येथील नागरकांमध्ये तसेच आदिवासी वाडीमध्ये रोगराई पसरू लागली आहे. गोदाम मालकांकडून रात्रीच्या काळोखात हा सडका कांदा अवैद्यरित्या परिसरात टाकण्यात येत असल्याने येथील आजूबाजूच्या परिसरातही धोका निर्माण झाला आहे. याबाबत होणाऱ्या त्रासातून सुटका मिळवून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.