ठाणे - जिल्हातील कामगारांची नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी आणि उद्योग नगरी असलेल्या उल्हासनगर शहरातून हजारो परप्रांतिय कामगारांनी टाळेबंदीच्या भीतीने कुटूंबासह मूळ गावाकडे पलायन करण्यासाठी कल्याण रेल्वे स्थनाकात गर्दी केल्याचे पाहवयास मिळाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पुन्हा कामगारांचे पलायन
ठाणे जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी व खासगी कोविड रुग्णालयात खाटांची समस्या असल्याने नातेवाइकांना रुग्णाला घेऊन या रुग्णालयातून त्या रुग्णालयात वणवण भटकावे लागत आहे. त्यातच कोरोनाला आळा बसवण्यासाठी एक-दोन दिवसांत कठोर निर्बंधाची घोषणा होण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पुन्हा राज्यात 15 तारखेपासून लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत भिवंडी आणि उल्हासनगरमधील हजारो परप्रांतिय घरी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात आज (दि. 12 एप्रिल) सकाळपासून मोठया प्रमाणात कुटूंबासह रेल्वे स्थाकानाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. हातामध्ये आणि पाठीवर मोठ-मोठ्या बॅगा घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानला जाणारे अनेक प्रवासी या ठिकाणी होते.
टाळेबंदीमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून जिल्ह्यातील विविध शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णासंख्येला रोखण्यासाठी राज्यभर सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध तर शनिवार व रविवार या दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. शासन निर्देशाची अमंलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याने विविध शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जमावबंदी व टाळेबंदीमुळे कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत मिळणार आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे शहरातील कामगारांवर मात्र उपासमारीची शक्यता ओढवली आहे.
नियमांमधून सूट दिली असली तरी इतर व्यवस्थापणे बंद
भिवंडीत यंत्रमाग व कापड व्यवसाय तसेच गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. यंत्रमाग व्यवसायाला अत्यावश्यक सेवेप्रमाणे लॉकडाऊनच्या नियमांमधून सूट दिली असली तरी इतर व्यवस्थापणे बंद असल्याने त्याचा फटका येथीक कामगारांना सहन करावा लागत आहे. शहरात इतर छोटे मोठे व्यवसाय व्यापार असलेली आस्थापने बंद असल्याने या दुकानातील व आस्थापणामधील कामगारांवर उपासमार ओढवली आहे.
सण-उत्सवात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची कोंडी
जिल्ह्यात सध्या 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आल्याने सर्व दुकाने बंद करण्यात येत आहेत. त्यातच एप्रिल महिन्यात सणोत्सव सुरू होणार असल्याने व्यापारी वर्गाकडून या महिन्यात व्यवसायातून नफा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येणार होता. मात्र, याच महिन्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर केल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होऊन आर्थिक कोंडी होऊन बसली आहे. सहाजिकच या सर्व बाबींचा परिणाम या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगारांवर होणार आहे.
कामगारांना आर्थिक मदत करण्याच्या मानसिकतेत नाही
मागील वर्षी व्यापाऱ्यांनी टाळेबंदीमध्ये आपल्या कामगारांना उदरनिर्वाहाच्या साहित्याचा पुरवठा त्याचबरोबर थोडीफार आर्थिक मदत केली होती. मात्र, यावेळी व्यापाऱ्यांवरच आर्थिक संकट ओढवल्याने व्यापारी कामगारांना आर्थिक मदत करण्याच्या मानसिकतेत नाही किंबहुना त्यांना तशी मदत करणे सध्यातरी शक्य नाही, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत असल्याने यावेळी संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कामगारांवर निश्चितच उपासमार ओढवणार असल्याची शक्यता कामगार वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - पनवेलमध्ये बैलगाडी शर्यतीवर पोलिसांची कारवाई; सातजण अटकेत