ठाणे: मुंबईमध्ये गोवर, रुबेलाने सात मुलांच्या मृत्यूची घटना ताजी असताना ठाण्यात देखील गोवरची साथ डोकं वर काढताना दिसत आहे. याची दखल घेत ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा हायअलर्ट मोडवर आली आहे. ज्या ठिकाणी गोवरचे रुग्ण (Measles patients ) आढळत आहेत, त्या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ठाण्यात २९ तर भिवंडीमध्ये ४४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
नवी मुंबईत रुग्ण वाढले- तर नवी मुंबई २९, मिरा भाईंदर ११ रुग्णांची नोंद झाली आहे. शहरी भागात ज्याप्रमाणे गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे त्याच प्रमाणे ग्रामीण भागात देखील गोवर रुग्ण आढळत आहेत. या संपूर्ण रुग्णांची संख्या पाहता लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवली जात आहे.
ठाणे महापालिका सतर्क- (Thane Municipal Corporation alert) सर्वात जास्त रुग्ण मुंब्रा कौसा विभागात नोंद करण्यात आले आहेत. गोवरवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून ठाण्यात वर्षभरात १८५ संशयित रुग्ण आढळून आले असून त्यातील गोवरचे २८ रुग्ण असून गोवर-रुबेलाचे ५ रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांमध्ये एक वर्षाच्या आतील चार, १ ते ५ वर्षांपर्यंत १३ आणि उर्वरित ११ रुग्ण हे ५ वर्षांवरील आहेत. यातील २८ पैकी ७ रुग्णांनी प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा तर ३ रुग्णांनी एक मात्रा घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे १८ रुग्णांनी एकही लस घेतलेली नाही
ही आहेत लक्षण सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार पुढील उपाययोजना कराव्यात. यासोबत लसीकरण या आजाराला रोखू शकते. त्यामुळे आपल्या लहानग्यांकडे बारीक लक्ष देऊन लसीकरण करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.