ठाणे - लॉकडाऊनचा फायदा घेत मुरबाड तालुक्यातील रेशन दुकानदार गरीब-गरजू शिधापत्रिकाधारकांकडून पिवळे रेशन कार्ड मिळवून देण्याच्या बहाण्याने आर्थिक लुबाडणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे कुटुंब पोटाला चिमटे काढून आला दिवस काढत आहेत. यामध्येही त्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याने गावकऱ्यांनी त्या रेशन दुकानदारावर कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदारांकडे धाव घेतली आहे.
साजई गावात २६० शिधापत्रिकाधारक आहेत. यापैकी बहुसंख्य शिधापत्रिकाधारकांना प्राधान्याचे रेशन मिळते. या योजनेपासून वंचित असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना दुकानदाराने तुमच्या शिधापत्रिकेचा बी. पी. एल. योजनेत समावेश करतो, असे सांगून शिधापत्रिकाधारकांकडून प्रत्येकी एक हजार ते १२०० रुपये घेतल्याचा आरोप महिलांनी केला. तसेच त्यांना फिजिकल डिस्टंन्सिंग पाळ पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, पुरवठा अधिकारी बंडू जाधव यांनी तक्रादार महिलांना उडवा-उडवीची उत्तरे देत वेळ मारून नेल्याचे दिसून आले.
यापूर्वीही रेशन पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची तालुक्यात सर्वत्र बोंब आहे. याबाबत गाव पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, पुरवठा अधिकारी जाधव यांना तक्रारी करीत आहेत. मात्र, जाधव हे तक्रारदारांची नावे उघड करत आहेत. तसेच रेशनिंगच्या भ्रष्टाचारात जाधव सामील असल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. तक्रादारांची नावे उघड करून जाधव गोपनीयतेचा भंग करत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच काही नागरिकांनी केल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नसून उलट जाधव यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही महिलांनी केला. यामुळे तहसीलदार अमोल कदम यांच्या कारभारावर गावकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे.