ठाणे - भिवंडी तालुक्यातील आमने गावामध्ये एकाच ठिकाणी असलेल्या दोन कंपन्यांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
वरपल आणि महावीर लॉजिस्टिक या दोन कंपन्यांना आग -
कल्याण-पडघा मार्गावरील आमने गावामध्ये महावीर कंपाऊंडमध्ये वरपल आणि महावीर लॉजिस्टिक या दोन कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांना आज पहाटे चारच्या सुमाराला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. या दोन्ही कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे शालेय साहित्य आणि इतर वस्तुंची साठवणूक करण्यात येते. सर्वात आधी वरपल या वह्या-पुस्तके तयार करणाऱ्या कंपनीला आग लागली. त्यानंतर काही वेळातच शेजारी असलेल्या महावीर लॉजिस्टिक या कंपनीला भीषण आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच भिवंडी, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
हेही वाचा - गुडविन ज्वेलर्सचे मालक अक्काराकरन बंधुना अटक
आगीचे कारण अस्पष्ट, कोणालाही दुखापत नाही -
भिवंडीत सतत आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आता वरपल आणि महावीर लॉजिस्टिक या दोन कंपन्यांना आग लागली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - विना मास्क फिरणाऱ्या लोकलमधील प्रवाशांकडून 8 लाख 92 हजारांचा दंड वसूल