ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकरी प्रश्नांवर काढलेल्या मोर्चात पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे दुःख मांडणाऱ्या राजू शेट्टींना ठाकरेंनी मदत केल्यामुळे आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहोत, अशी माहिती मोर्चेकरी शेतकऱयांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकरी मनसेच्या मोर्चात सामील होण्यासाठी ठाण्यात दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी राज्यातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत सरकारला जाब विचारला होता. तसेच विविध शहरात मोदी-शाह जोडीविरोधात रान उठवत "लाव तो व्हिडिओ" म्हणत भाजप सेनेच्या कारनाम्याचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे अनेक शेतकरी या मोर्चात आज सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या पिकावर वर्षोनुवर्षे डल्ला मारून दलाल कोट्यधीश झाले. मात्र, शेतकरी आजही दुष्काळी जीवन जगत आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेने जे पाऊल उचलले आहे, त्यासाठीच आज शेतकरी या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत, अशी माहिती सांगलीतील शेतकऱ्यांनी दिली.
मनसेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच शेकडो शेतकरी ठाण्यात दाखल झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था जय भगवान सभागृहात करण्यात आली होती.