ठाणे- भिवंडी तालुक्यातील शेतजमिनीला सोन्याचा भाव आलेला असताना बांधकाम विकासकांकडून शेतकऱ्यांची, जमीन मालकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या शेतकऱ्यांनी आपली कैफियत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासमोर मांडली. त्यांनी भिवंडी तालुक्यातील पिंपळास येथे येऊन भूमीपुत्र व शेतकरी बचाव संघर्ष समिती पिंपळासच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून न्याय मिळून देण्याचा निर्धार केला आहे.
हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार
पिंपळास व आसपासच्या गावामध्ये काही भूमाफिया ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे खोटे दस्तावेज बनविणे, खोट्या सह्या घेणे, काहींच्या नमूद सर्वे नंबरमध्ये परस्पर सर्वच्या सर्व सर्वे नंबरचा समावेश करणे, मृत व्यक्तींच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तींना उभे करून खोट्या सह्या घेऊन खरेदीखत करणे, गोडाऊनचा ताबा न देणे, शेतकऱ्यांवर पोलिसांकडे खोट्या तक्रारी बिल्डरांकडून दाखल करणे, अशा तक्रारी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे आल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा कायदेशीर अभ्यास करून योग्य त्या मार्गाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या बिल्डर्स लॉबीचे धाबे दणाणले आहेत.