ठाणे - गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरासह जिल्ह्यातील पोलीस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहेत. ठाण्यातील अनेक इमारती तसेच पोलिसांच्या जुन्या बैठ्या चाळींना 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. पोलिसांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी पोलिस पत्नी आणि महिलांनी एकनाथ शिंदे यांच्याशी सवांद साधत पोलीस कुटूंबीयांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. दरम्यान शिंदे यांनी समस्या ऐकून घेत लवकरात लवकर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
हेही वाचा... चारा छावण्यातील गैरप्रकारावर सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू - राजू शेट्टी
पोलिसांच्या शासकीय निवासाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. ठाण्यात सध्या हजारो पोलिसांची कुटूंब वास्तव्य करीत आहेत. 12 बैठ्या चाळी आणि 27 इमारती आहेत. काही इमारती सुसज्ज असून उर्वरित इमारतींचे पुनर्निर्माण होणे बाकी आहे. वर्तकनगर म्हाडा, जरीमरी पोलीस वसाहत जवळील इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. यावर कोणताही निर्णय अध्याप झाला नसल्याचे लक्ष वेधले. पोलिसांना घराचा प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सरकारकडून करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
हेही वाचा... '...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'
पोलीस वसाहतीच्या या भेटीत अनेक कुटूंबीयांशी त्यांनी सवांद साधला. इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, तसेच इमारतींची पुनर्बांधणी केली जाईल, असे पोलीस वसाहतीमधील नागरिकांना त्यांनी सांगितले आहे. या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेर असतात. पोलिसांचे राहते घर सुरक्षित असले पाहिजे, हाच उद्देश समोर ठेवून हे सरकार वसाहतीचा प्रश्न मार्गी लावेल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
हेही वाचा... नागरिकत्व कायदा न्यायालयात टिकल्यानंतर राज्यात लागू करण्याविषयी विचार करू - उद्धव ठाकरे
पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासाहून 8 तास करणार
मुंबई वगळता राज्यात पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासांची आहे. पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. मुंबई पोलिसांना जशी 8 तासांची ड्युटी आहे, तशीच जिल्यातील पोलिसांचे देखील कामाचे 8 तास करण्याचा मानस सरकारचा आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे देखील गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सावरकर हे देशाचे दैवत
स्वातंत्रवीर सावरकर हे राज्याचा नव्हे देशाचे दैवत समान आहेत. त्यांनी देशासाठी त्याग केलेला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. सावरकर हे आम्हाला आदर स्थानी आहेत, असे शिंदे यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. हे राज्याच्या हितासाठीचे सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात कुठेही मतभेद नाहीत, असेही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा... जागतिक चहा दिनादिवशी भाजपचा चहापानावर बहिष्कार; अशोक चव्हाणांचा टोला