ठाणे - बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बांधकाम विकासकांच्या टोळीने शेतकरी असलेल्या भावांच्या जागेत सदननिका, गाळे, बंगले उभारून करारनाम्यानुसार त्यामधून मिळालेला मोबदला तसेच बंगले, गाळे, सदनिका न देता आपसात संगमनत करून शेतकऱ्याला ३७ कोटी ४१ लाख १३ हजार ५०० रुपयाची फसवणूक केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२० सह ४०६, ४०९, ५०६, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
आशिष सुरेश वाधवा, लता सुरेश वाधवा, अंकिता सुरेश वाधवा (सर्व रा. गोदरेज हिल, कल्याण) गुल जयरामदास पंजवाणी, लक्ष्मण जयरामदास पंजवाणी, संतोष जयरामदास पंजवाणी आणि सागर गुल पंजवाणी असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम विकासकांची नावे आहेत. तर दिलीप नामदेव भाईर (वय ४८) आणि गणेश भोईर ( दोघेही रा. चिकनघर कल्याण ) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याची नावे आहेत.
काय आहे प्रकरण
दिलीप व गणेश भोईर यांची शेतजमीन कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या छोटा म्हसोबा मैदान, चिकनघर या ठिकाणी आहे. तर आरोपीचे उल्हासनगर कँम्प नंबर ४ परिसरात कार्यालय आहे. याच कार्यालयात तक्रारदार दोघा भावांनी २३ जुलै २००७ रोजी आरोपी वाधवा आणि पंजवाणी कुटूंबाला जागा ठरल्याप्रमाणे करारनामा करून इमारती उभारण्यासाठी दिली होती. त्यांनतर आरोपींनी या जागेत सदनिका, गाळे आणि बंगले उभारली होती. यामधील काही सदनिका, गाळे आणि दोघा भावांना २ बंगले देण्याचे ठरले होते. मात्र आरोपींनी ९० लाख देणे अपेक्षित असताना केवळ ५२ लाख ५० हजार दिले. तसेच ५० टक्के सदनिका, गाळे, बंगला त्यांच्या ३७ कोटींच्यावर संपत्तीचा पसरस्पर अपहार केला. त्यांनतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर शेतकरी दिलीप भोईर यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वाधवा कुटूंबातील ३ आणि पंजवाणी कुटूंबातील ४ अश्या ७ जणांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) डी. के. कापरे करीत आहेत.