सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (दे.) येथे पोहण्यासाठी गेलेल्या मामा व दोन भाच्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने गावावर येथे शोककळा पसरली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे दोघे भाचे जावळाच्या कार्यक्रमासाठी गावाला आले होते.
गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान गावाजवळच्या सुधाकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत ही दुर्घटना घडली. शिवराम मोतीराम गवळी (25), युवराज सुनील छत्रबंद (11), समर्थ बंडू धर्मसाले (15) अशी मरण पावलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येथे मोतीराम गवळी यांच्या घरी जावळचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरातील नातेवाईकांसोबत हे तिघेही तिथे गेले होते. पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. युवराज आणि समर्थ या दोघांना पोहता येत नसल्याने मामा शिवराम गवळी हा आपल्या भाच्यांना वाचवण्यासाठी विहिरीत गेला असता त्याचा ही विहिरीत बुडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गावकऱ्यांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृत शिवराम हे पुणे येथे खासगी कंपनीत कामावर होते. घरगुती कार्यक्रम असल्याने सुट्टी घेऊन चार दिवसांपूर्वीच शिवराम बोरगांवला आले होते. घटनेची माहिती समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस हवालदार अजय भोसले व पोलीस नाईक अरुण राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून, याबाबत अधित तपास सुरू आहे.