सोलापूर - पाण्यापासून वंचित असणाऱ्या ३६ गावांचा पाणी प्रश्न मीच सोडवणार असल्याचे वक्तव्य करमाळा विधानसभेचे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी केले. आजपर्यंत तुम्ही इतरांना संधी दिली आहे. एक वेळ मला संधी देऊन पाहा. जर तुमचे प्रश्न सोडावायला कमी पडलो तर पुढच्या वेळेस मतांचा जोगवा मागायला येणार नाही असेही शिंदे म्हणाले.
बारलोणी येथे संजयमामा शिंदे यांच्या प्रचाराचा समारोप झाला. त्यावेळी आयोजीत सभेत संजयमामा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयवंतराव जगतापही होते.
शब्द पाळला नाही तर संजय शिंदे हे नाव लावणार नाही
विरोधक काहीही टीका करत असले तरी एक लक्षात ठेवा. या ३६ गावांचा प्रश्न मीच सोडवणार आहे. दिलेला शब्द पाळायला कमी पडलो तर संजय शिंदे हे नाव लावणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - नव्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं, असं जीवन अन् राजकारणही नको; धनंजय मुंडे भावुक
हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट
पुर्वजांच्या पुण्याईवर मतदान मागणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा - जगताप
माढा-करमाळा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मी संजय शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणी जातीवर तर कोणी पूर्वजांच्या पुण्याईवर मतदान मागत आहे. त्यांना घरचा रस्ता दाखवा व मामांना विकासासाठी साथ द्या, असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.
सालसे ते यावली या करमाळा-माढा-मोहोळ या तीन तालुक्यातील रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. आज त्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे एकनाथ महाराज पालखी मार्ग, सबस्टेशन, बेंद ओढ्यात उजनीचे पाणी सोडणे, कुर्डूवाडी रेल्वेच्या वर्कशॉपसाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. मामा जि.प.अध्यक्ष झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासालाच गती मिळाल्याचे वक्तव्य माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी केले. मामांना करमाळा-माढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या, ते संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत असेही बबनदादा शिंदे म्हणाले.