पंढरपूर (सोलापूर) - केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले आहेत. त्यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे पुणे-पंढरपूर महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. तसेच, मंगळवेढा येथील स्वाभिमानीचा कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. कृषी कायदे तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली.
हेही वाचा - अमरावती-नागपूर महामार्गावर पोलीस सज्ज; शेतकरी करणार 'चक्का जाम'
कृषी कायदे मागे घ्या, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
स्वाभिमानीचे माळशिरस तालुकाअध्यक्ष अजित बोरकर म्हणाले, 'केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरुद्ध काळे कायदे केले आहेत. ते तत्काळ मागे घ्यावे, यासाठी वेळापूर येथे 'रास्ता रोको' करण्यात आला आहे.' सरकारने तत्काळ कृषी कायदे मागे न घेतल्यास स्वाभिमानीकडून अजून तीव्र आंदोलनाचा इशारा बोरकर यांनी दिला.
स्वाभिमानी कडून विविध ठिकाणी रास्ता रोको
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंगळवेढा येथे राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा-सांगोला महामार्गावर दुपारी साडेअकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - कृषी कायद्याच्या निषेधार्थ सांगली -इस्लामपूर मार्गावर चक्काजाम