पंढरपूर (सोलापूर) - गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या व भारतीय राजकारणातले चाणाक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ओळखले जाते. आता पवारांवर पंढरपुरातील एका प्राध्यापकाने पीएचडी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'मला शरद पवारांवर पीएचडी करायची आहे', असा मिश्किल शैलीत टोला लगावला होता. मात्र, त्यांची ती इच्छा पंढरपूर शहरातील कर्मयोगी भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या दत्तात्रेय काळेल यांनी पूर्ण केली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून शरद पवार यांच्यावरील शोधनिबंधला मान्यताही देण्यात आली आहे.
पंढरपुरातील प्राध्यापकांकडून शरद पवारांवर पीएचडी
डॉ. प्रा. दत्तात्रेय काळेल सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील राहणारे आहेत. पंढरपूर येथील कर्मयोगी भाऊराव पाटील महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, त्यावेळेस त्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वगुणाचे आकर्षण होते. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात एमफिल केली. यावेळी त्यांना 'शरद पवार व महाराष्ट्रात पुरोगामी दलाचे शासन एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर चिकित्सक पद्धतीने संशोधन करण्याची संधी मिळाली. 1978 साली शरद पवार यांनी महाराष्ट्र 7 पक्षाचे मिळून पुलोदचे सरकार स्थापन केले होते. मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची चिकित्सकपणे अभ्यास करून प्राध्यापक काळेल यानी संशोधन केले आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून शरद पवार यांच्या केलेल्या संशोधनावर त्यांना मान्यताही मिळाली आहे.
खासदार शरद पवार यांची संशोधन संदर्भात भेट
पंढरपूर येथील कर्मयोगी भाऊराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्राचे विभागप्रमुख म्हणून डॉक्टर दत्तात्रेय काळेल काम पाहत आहेत. शरद पवार यांचा संशोधन प्रबंधक तयार करत असताना त्यांनी शरद पवार यांची दोन वेळा भेटही घेतली. त्याचवेळी खासदार शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करून प्रबंध तयार केला. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, एमडी पाटील, सुधाकरपंत परिचारक या दिग्गज नेत्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यासह खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, आमदार रोहित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाविषयी चर्चाही केली. प्रोफेसर काळेल यांना या संशोधनासाठीा या सर्वांच्या मार्गदर्शनाचा चांगला फायदा झाला आहे.
42 वर्षानंतर तो प्रयोग करून आघाडी सरकार स्थापन
1978 साली शरद पवार यांनी महाराष्ट्रात असाच चमत्कार करून पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन केले होते. तो प्रयोग 42 वर्षानंतर 2019 साली पुन्हा राबवण्यात आला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना एकत्रित आणून आघाडीचे सरकार पवारांनी आणून दाखवले. याची आठवणही त्यांनी करून दिली. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर पीएचडी करेन, असे विधान केले होते. हा एक मिश्किल शैलीतील टोला होता. पण, प्राध्यापक काळेल यांनी ते खरे करून दाखवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पंतप्रधानांची घोषणा, मासिक भत्ता, मोफत शिक्षण