पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर 24 जूनपासून नित्योपचार दररोज सुरू झाले आहेत. मात्र, वारकरी, भाविकांना मंदिर आणि परिसरात प्रवेशबंदी असणार आहे.
परंपरेप्रमाणे विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला आहे. प्रतिवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेला विठ्ठलाचा पलंग काढला जातो. विठोबाला लोड तर, रुक्मिणी मातेला तक्क्या देण्यात येणार आहे. या दिवसापासून विठ्ठलाचे दर्शन दरवर्षी चोवीस तास भक्तांसाठी सुरू होते. मात्र, यंदा कोरोनामुळे सामान्य भाविकांना दर्शन बंद आहे. प्रथा-परंपरेचा एक भाग म्हणून विठुरायांच्या शेजघरातील पलंग काढण्यात आला.
विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर नित्योपचार होणार आहे. त्यामधे नित्यपूजा, महानैवेद्य, लिंबूपाणी असे नित्योपचाराचे विधी असतील. आषाढीयात्रा कालावधीत हे विधी होणार आहेत.
कोरोनामुळे विठ्ठल मंदिर गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे आषाढी यात्राही रद्द करण्यात आली आहे. वारकरी आणि भाविकांसाठी मंदिर 30 जूनपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.