सोलापूर- उसासाठी रास्त व किफायतशीर (एफआरपी) जाहीर न करताच जिल्ह्यातील 24 साखर कारखानदारांनी गाळप सुरू केले आहे. गळीत हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी अद्याप एफआरपी ठरली नाही. याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात 34 साखर कारखाने आहेत. त्यामधील 24 साखर कारखान्यांनी अद्यापही एफआरपी रक्कम ठरवली नाही.
एफआरपी रक्कम जाहीर केलेले साखर कारखाने-
श्री पांडुरंग (3,135रुपये प्रति टन) ,विठ्ठल (2,705 प्रति टन), युटोपियन शुगर (2,824 प्रति टन), जय हिंद शुगर (2,758 प्रति टन), सासवड माळी साखर कारखाना(2,964 प्रति टन), स.म.मोहिते पाटील (3,921 प्रति टन),संत कूर्मदास (2,707 प्रति टन), बबन राव शिंदे(2,855 प्रति टन), विठ्ठल राव शिंदे (3,032 प्रति टन),मकाइ सहकारी साखर कारखाना (2,323 प्रति टन), विठ्ठल कार्पोरेशन (2,855 रुपये प्रति टन)
महिना उलटूनही एफआरपी अनिश्चित-
जिल्ह्यातील 24 साखर कारखान्यांनी एफआरपी निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदने दिली आहेत. तरीदेखील प्रशासन याकडे डोळे झाक करत आहे.
आंदोलनात स्वतः शेतकरी उतरतील-
एफआरपीच्या रकमा न ठरवल्याने शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. प्रशासन हे आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांना आंदोलनात उतरण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाची शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ-
ऊस दराचे आंदोलन शमविण्यासाठी प्रशासनाने शेतकरी आणि साखर कारखानदार यामध्ये बसून तोडगा काढण्याऐवजी पाठ फिरवली आहे. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगलीत एकरकमी एफआरपी देण्याचा कारखानदारांचा निर्णय-
सांगली जिल्ह्यात ऊसदराची कोंडी या महिन्यातच फुटली आहे. एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला आहे. सांगलीच्या कडेगावमध्ये पार पडलेल्या कारखानादार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये स्वाभिमानीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हा एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य झाला आहे.